मुंबई : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या (Fire) दुर्घटनेत एकूण 6 कामगारांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. तर, मयत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. आग शमविण्यासाठी तसेच अडकलेल्यांना सुखरूप काढण्यासाठी करण्यात आलेल्या बचाव कार्याची माहितीही त्यांनी घेतली व हे मदत कार्य व्यवस्थित पार पडण्यास सांगितले, असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 


याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, "छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत एका हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीस लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटना दुर्दैवी आणि दुःखदायक आहे. मध्यरात्री लागलेल्या या आगीत सहा कामगारांचा जळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून या मृत कामगारांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय जखमी कामगारांना तातडीने शासकीय खर्चाने सर्व वैद्यकीय उपचार द्यावेत अशाही सूचना प्रशासनाला दिल्या आहेत."






कंपनी मालकासह ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा...


वाळूज भागातील कंपनीत लागलेल्या आगीच्या घटनेनंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तसेच, याबाबत ट्वीट करत दानवे म्हणाले की, "राज्यातील औद्योगिक परिसरात सातत्याने मनुष्य हानीचे अपघात घडत आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व कामगार विभाग अशा दुर्दैवी घटना घडत असताना कोणतेही सुरक्षेची काळजी घेत असल्याचे दिसत नाही. अशीच घटना आज रात्री संभाजीनगर येथील वाळुज एमआयडीसीतील सनराईस एटरप्राईज या कंपनीत घडली. या दुःखद घटनेत 6 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये दोषी असणाऱ्या संबंधितावर कारवाई करावी व कंपनी मालकासह ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सदरील ठिकाणी पाहणी करून केली," असल्याचे दानवे म्हणाले. 


एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा: शिरसाट 


याचवेळी शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांनी देखील देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना शिरसाट म्हणाले की, "या ठिकाणी कामगार राहत होते. तिथे दारूच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. ही सर्व घटना कंपनी मालकाच्या चुकीने घडली आहे. परप्रांतीयकामगारांना या ठिकाणी आणून तिथेच काम करून तिथेच खाण्यापिण्याची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे, कंपनी मालकावरती 302 चा गुन्हा दाखल करायला हवा. तसेच, या सर्व गोष्टीला दुर्लक्ष करणारे एमआयडीसीचे अधिकारी हे अतिक्रमण असलेल्या कंपनीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे त्यांना देखील दोषी धरायला हवे," असे शिरसाट म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


डोळ्यासमोर भीषण आग, बाहेर पडण्याचा मार्गही बंद; आगीत बचावलेल्या कामगारानं सांगितला सुटकेचा थरार