चंद्रपूर : भाजपने महाराष्ट्रातील लोकसभा मिशन 45 ची सुरुवात चंद्रपूरमधून (Chandrapur Lok Sabha) केली. भाजपचे चंद्रपूर लोकसभेचं उमेदवार सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar ) यांचा उमेदवारी अर्ज आज दिग्गजांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर उपस्थित होते.

  


अब की बार 400 पार, मोदींना पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान करणार आहोत, सुधीर मुनगंटीवार यांचा आवाज आजपर्यंत राज्यात घुमत होता आता तीच तोफ दिल्लीत धडाडेल, सुधीर मुनगंटीवार मोठ्या मतांनी विजयी होतील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 


तर तुम्ही डोळ्यातील अश्रू पाहून, वैयक्तिक सहानुभूतीवर मतदान कराल, तर पुढील पाच वर्ष तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतःच करावी लागेल, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेस उमदेवार प्रतिभा धानोरकर यांच्यावर हल्ला चढवला.  


यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं सुरुवातीला भाषण झालं. बावनकुळे यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री आणि वनमंत्री म्हणून केलेल्या कामाचं कौतुक केलं. 


चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले? 


महाराष्ट्राचा महायुतीचा पहिला अर्ज आहे. महाराष्ट्रातून 45 खासदार महायुतीचे निवडून येतील आणि त्याची सुरुवात चंद्रपुरातून होत आहे. मोदींनी विकसित भारत आणि महाराष्ट्राची गॅरंटी घेतली आहे. विकसित भारतासाठी आज आपण चंद्रपूरच्या विकासाची एक वीट लावत आहो.  


मुनगंटीवार यांनी राज्याचे कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून फडणवीस यांच्या नेतृत्वात चांगले काम केले. त्यामुळे चंद्रपूरचा विकास करायचा असेल तर मुनगंटीवारसारख्या व्यक्तीला निवडून दिले पाहिजे. हंसराज अहिर यांनी विकास केला, आता तोच विकास दहा पट पुढे न्यायचा असेल तर सुधीर मुनगंटीवार ते करू शकतात. 


आजवर जेवढे मतं चंद्रपुरात कोणत्याही उमेदवाराला मिळाले नसेल तेवढे मत मुनगंटीवार यांना मिळतील. त्यासाठी भाजपच्या सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मेहनत करावी लागेल. 


राहुल गांधी यांनी सावरकर यांचा अपमान केला. 17 एप्रिलला रामनवमी आहे आणि 19 एप्रिलला मतदान आहे. समजले ने काय करायचे? 17 तारखेला श्रीरामाची महाआरती करायची आणि 19 तारखेला मोदींसाठी भरभरून भाजपला मतदान करायचं, असं बावनकुळे म्हणाले.


सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल 


घाई घाई मध्ये मी मंचावर आलो. जर कोणाचे नाव घ्यायला विसरलो असेल, तर पाय आपटू नका. कारण तुम्ही पाय आपटले तर निवडणुकीत आपटायची वेळ येईल. मी देवाचा आशीर्वाद घेऊन आलो मात्र ज्यांच्या नावांमध्येच देव आहे ते देवेंद्र फडणवीस आशीर्वाद द्यायला आले असतील तर जगातली पराभूत करू शकत नाही. 


महायुती चे सर्व घटक आणि कार्यकर्ते कृत्रिमपणे नाही, तर मनापासून कामाला लागले आहे. म्हणून वाटते निवडणूक माझी नाही. तर ही बंधूंनो तुमची आहे.  


म्हणून ठरविले आहे जिंकलो तर माजायचे नाही, हरलो तर खाचायचे नाही. 


पत्रकार म्हणतात निवडणुकीत दोन मुद्दे आहे. त्यापैकी एक आहे जात.जर कोणी जातीच्या नावाने प्रचार करणार असेल तर तो आपल्या पायावर धोंडा मारून घेणार.या मतदारसंघात सर्व समाजातील लोक आहेत. मी प्रत्येक जातीच्या लोकांची सेवा करणार. 


प्रतिभा धानोरकर यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला


मी मतदारांना सावध करतो, जर तुम्ही डोळ्यातील अश्रू पाहून फक्त वैयक्तिक सहानुभूतीवर मतदान कराल.  तर पुढील पाच वर्ष तुमच्या डोळ्यात पाणी येईल आणि तुम्हाला तुमचीच सहानुभूती स्वतःची स्वतःच करावी लागेल, असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला केला.


माझी लढाई काँग्रेसच्या उमेदवार सोबत नाही. मी विकासाबद्दल बोलणार, समोरच्या उमेदवार यांनी त्यांचे सरकार असताना किती काम केले, किती दिवे लावले हे सांगितले पाहिजे.. सत्तेत असताना किती झोपा काढल्या हे सांगायला पाहिजे. 


काँग्रेस कुंभकर्णापेक्षा पुढे आहे. कुंभकर्ण म्हणेल काँग्रेसवाले तर माझेही बाप आहेत. मी सहा महिने झोपायचो हे वर्षभर झोपतात  


मतदारांच्या प्रगतीची उंची नक्कीच वाढेल


चंद्रपूर लोकसभेसाठी बावनकुळे, फडणवीस आणि मोदींनी माझी आदरपूर्वक निवड केली आहे. आता मला चंद्रपूरला एक नंबरचा मतदारसंघ करायचा आहे. मी निवडून आलो तरी माझी उंची आणि वजन वाढणार नाही. आणि हरलो तरी उंची कमी होणार नाही.  पण मी निवडून आलो तर मतदारांच्या प्रगतीची उंची नक्कीच वाढेल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 


मुनगंटीवारांची तोफ आजवर मुंबईत आणि राज्यात धडधडत होती. आता ती दिल्लीत धडधडणार आहे. 


ही राज्याची निवडणूक नाही, तर ही देशाची निवडणूक आहे. देश कोणाला सोपवायचे आहे, देशात राज्य कोणाचा आणायचा, मोदींचा की राहुल गांधींचा याचा निर्णय करणारी ही निवडणूक आहे. सुधीर मुनगंटीवार यांना दिलेलं मत मोदींना दिलेलं मत ठरेल. 


राहुल गांधींची यात्रा जिथे जिथे केली तिथे काँग्रेस फुटली. देशात कुठेही गेल्यावर फक्त मोदींचे नाव ऐकायला मिळते.  


जे संपूर्ण जगाला जमले नाही, ते मोदींनी दहा वर्षात करून दाखवले. त्यांनी 25 कोटी लोकांना गरीब देशाच्या वर आणले. मोदींचे सरकार मूठभर लोकांचा सरकार नाही. 


महाराष्ट्रात महायुती भक्कम झाली आहे. भाजपसोबत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासप असे अनेक पक्ष सोबत आहे. 


देशभरातील वनक्षेत्राचा रिपोर्ट पब्लिश झाला. देशात फक्त एकच राज्य होतं, जिथे जंगल क्षेत्र वाढले होते आणि तो महाराष्ट्र होता. आणि त्याचं कारण म्हणजे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.


जी वाघ नखे इंग्रजांनी चोरून नेली होती. ती भारतामध्ये आणण्याचं काम हे सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. 


माझा तुम्हाला सवाल आहे.. भाजप किंवा महायुतीच्या शिवाय कोण विकास करू शकतो?


मागच्या काळात एक अपघात झाला आणि हंसराज अहिर यांचा थोड्या मतांनी पराभव झाला. आमचे मित्र दिवंगत झाले ( बाळू धानोरकर ) म्हणून त्यांच्यावर बोलू इच्छित नाही. त्यांच्या काळात कोणता विकास झाला? तेव्हा तर महाविकास आघाडीचे सरकारही होते तरी विकास झाला नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केली. 



संबंधित बातम्या 


फडणवीसांच्या जन्मगावातून भाजपची 'मिशन 45' ला सुरुवात, पहिला उमेदवारी अर्ज भरला, मुनगंटीवार म्हणाले, अश्रू बघून मतदान नको, अन्यथा..