चंद्रपूर : कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांचे डॉ. अभय बंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दारूचा पैसा म्हणजे पापाचा पैसा असेल तर डॉ. बंग यांचा मुलगा फडणवीस यांच्यासह सहाव्या मजल्यावर बसत असताना ते गप्प का होते, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. सत्ता बदलताच बंग यांच्या भूमिकेत बदल झाल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे. चंद्रपूरच्या गांधी चौकातील सत्कार कार्यक्रमात त्यांनी ही टीका केली.


चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारण-समाजकारण दारूबंदीच्या मुद्द्यावर ढवळून निघाले आहे. पालकमंत्री रुपात विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदी उठविण्याबाबत समीक्षा समिती नेमू अशी भूमिका घेतली आहे. सोबतच चंद्रपूरच्या गांधी चौकातील जाहीर सभेत दारूबंदी समर्थकांवर टीका केली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी दारूबंदी उठविण्याबाबत 'दारूचा पैसा म्हणजे पापाचा पैसा' असे वक्तव्य केले होते. यावर गंभीर आरोप करताना कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी डॉ. अभय बंग यांना त्यांचा मुलगा फडणवीस यांच्यासह सहाव्या मजल्यावर बसत असताना दिसला नाही का? तेव्हा ते का गप्प होते? असा सवाल केला आहे. सत्ता बदलताच डॉ. बंग यांच्या भूमिकेत बदल झाल्याचा वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे. मात्र वडेट्टीवार दारूबंदी उठविण्याबाबत आता आर या पारच्या भूमिकेत असल्याचे त्यांच्या या वक्तव्यावरून दिसते आहे.

दारूबंदी असलेल्या चंद्रपुरात राज्य उत्पादन शुल्क विभागानं तब्बल 2 कोटींची दारु नष्ट केली आहे. दारुबंदी असूनही चंद्रपुरात मोठ्या प्रमाणावर अवैध दारु विक्री सुरु आहे. आणि याच मुद्यावर बोट ठेवत, राज्य उत्पादन शुल्क विभागानं चंद्रपुरातली दारुबंदी उठवण्याचा मानस नवे अर्थमंत्री अजित पवारांसमोर बोलून दाखवला आहे.

अर्थमंत्री झालेल्या अजित पवारांनी राज्य उत्पादन शुल्क विभागासोबत बैठक घेत, सरकारी तिजोरीत जमा होणाऱ्या गंगाजळीबाबत आढावा घेतला. चंद्रपुरात दारुबंदी असूनही अवैध दारुविक्री सुरु आहे. आणि त्यामुळं शेकडो कोटींचं नुकसान होत असल्याची बाब अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिली. चंद्रपुरातली दारु बंदी उठवावी असा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादर केल्याचं कळतं आहे.

मात्र महसुलासाठी चंद्रपुरातली दारुची दुकानं पुन्हा उघडणार असतील, तर आघाडी सरकारनं डान्सबार बंदी का केली होती? असा सवाल सुधीर मुनगंटीवारांनी उपस्थित केला आहे. बाटली आडवी करण्यासाठी अर्थात दारुबंदीसाठी चंद्रपूरच्या रहिवाशांनी 5 वर्षे संघर्ष केला आहे.

अशी झाली आंदोलनं आणि दारुबंदी
5 जून 2010 - श्रमिक एल्गार संघटनेनं दारूबंदीसाठी पहिली परिषद भरवली

फेब्रुवारी 2011 - तात्कालीन पालकमंत्री संजय देवतळे, सामाजिक कार्यकर्ते अभय बंग, विकास आमटे आणि शोभा फडणवीस यांचं सदस्य असलेली समिती स्थापन केली

2012 - समितीनं तात्कालीन मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला

6 ऑक्टोबर 2012 - चंद्रपुरातल्या 1 लाख महिलांनी दारूबंदीसंदर्भात तात्कालीन मुख्यमंत्र्यांना पत्र धाडलं

12 डिसेंबर 2012 - नागपुरात आलेल्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात आला

26 जानेवारी 2013 मध्ये चंद्रपुरात जेलभरो आंदोलन झालं

30 जानेवारी 2013 रोजी लाखोंच्या संख्येंन ऐतिहासिक मोर्चा काढण्यात आला

14 ऑगस्ट 2014 - पारोमिता गोस्वामी यांनी 30 महिलांसह मुंडन केलं

1 एप्रिल 2015 - सुधीर मुनगंटीवार यांनी आश्वासन पाळत चंद्रपुरात दारुबंदी जाहीर केली

दारुबंदी असलेल्या चंद्रपुरात दारुचा पूर!
(1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2019)
पकडलेले आरोपी - 41 हजार 995
दारू बंदी उल्लंघनाचे गुन्हे - 37 हजार 214
जप्त केलेल्या फोर व्हीलर ची संख्या - 1 हजार 921
जप्त केलेल्या टू व्हीलर ची संख्या - 6 हजार 103
पकडलेल्या दारू ची किंमत - 93 कोटी 69 लाख
जप्त मुद्दे मालाची एकूण किंमत - 219 कोटी 85लाख