नाशिक : महाराष्ट्र विकास आघाडीतील तिन्ही पक्षांमधील नेत्यांमध्ये खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तारावरुन नाराजीनाट्य सुरु आहे. या पार्श्वभूमिवर मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाचे नेते सर्वांचं समाधान करू शकत नाहीत. तीन पक्ष आहेत त्यामुळे नाराजी होणारच असं म्हटलं आहे. तसेच मंत्रिमंडळ विस्ताराला लागलेल्या उशिरावर बोलताना ते म्हणाले की, मला वाटत नाही की मंत्रिमंडळ आमच्यामुळे रखडलं असेल. काही खाती ही लहान आहेत. त्यामुळे काहीजण नाराज आहेत, असेही भुजबळ म्हणाले. ते नाशिकमध्ये बोलत होते.


भुजबळ म्हणाले की, मला कोणतंही खातं दिलं तरी चालेल. मला काय मिळणार याची मला कल्पना नाही. कृषीमंत्री पदाबद्दल मी काही ऐकलं नाही. ते वर्तमान पत्रातून दिसलं. तसेच महाविकास आघाडी जिल्हा परिषद निवडणूक एकत्रित लढणार असा आदेश आहे, असेही त्यांनी सांगितलं. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या तोडफोडीच्या घटनेवर बोलताना ते म्हणाले की, तो विषय काँग्रेसचा अंतर्गत आहे. आमचे सोळंके नाराज होते मात्र आम्ही त्यांची नाराजी दूर केली आणि ते थांबले आहेत. मला संजय राऊत यांच्याबद्दल कल्पना नाही. त्यांनी सांगितलं आहे की मी नाराज नाही, असेही भुजबळांनी सांगितलं.

हेही वाचा- Shivsena | मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत असंतोष, डझनभर आमदार नाराज असल्याची चर्चा

भुजबळ म्हणाले की, नाशिकमधील मेट्रोला विरोध केलेला नाही. मुंबईची लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे तिथं मेट्रो आवश्यक आहे. मात्र नागपूरमध्ये मेट्रोचे काय झालं आहे ते बघावं. मेट्रोची आवश्यकता असेल तर करा. मात्र अभ्यास करून निर्णय घ्यावा, असेही भुजबळांनी सांगितलं. नाशिकमध्ये बससेवेबद्दल सर्व लोकप्रतिनिधींनी विचार करावा हा नाशिकरांवरती टॅक्स बसणार आहे. त्यापेक्षा बस महामंडळाला पैसे दिले तर चांगले नाहीतर 100 कोटींचा भुर्दंड पडेल, असेही त्यांनी म्हटलं.

कर्जमाफीच्या निर्णयावर विचारले असता ते म्हणाले की, नियमित पैसे भरणाऱ्यांसाठी चांगली योजना सरकार आणेल.

हेही वाचा-  तानाजी सावंत यांच्या मंत्रीपदासाठी शिवसैनिक आग्रही ; शिवतीर्थापासून मातोश्रीपर्यंत घालणार दंडवत