भोपाळ: महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णांमुळे मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना अटकाव करण्यासाठी बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांत 21 मार्च पासून 31 मार्च पर्यंत आंतरराज्य बससेवा थांबवण्यात येणार आहे. 


महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मागील चोवीस तासांत 25,833 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 58 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 23,96,340 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 21,75,565 रुग्ण बरे झाले आहेत तर 53,138 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात मुंबईत फक्त 2,877 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे आणि आठ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर बुधवारी महाराष्ट्रात 23,179 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती.


मध्यप्रदेशमध्ये काल दिवसभरात 917 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका माणसाचा मृत्यू झाला आहे आणि 500 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मध्यप्रदेशात आतापर्यंत 2,71,957 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे त्यातील 2,62,031 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यात 6,032 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 3,894 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.