Ravikant Tupkar : कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे. या प्रश्नावरुन शनिवारी (11 फेब्रुवारी) स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात संघर्ष झाला होता. त्यानंतर तुपकरांसह  25 सहकाऱ्यांनाही 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आत्मदहन आंदोलनाच्या दणक्यानं 42 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश आलं आहे. 


... तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरू राहणार


शेतकऱ्यांच्या (Farmers) प्रश्नावर आक्रमक झालेल्या रविकांत तुपकरांसह दोनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून पोलिसांनी तुपकरांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. रविकांत तुपकरांना बुलढाण्याहून अकोला कारागृहात हलविण्यात आले आहे. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. जोपर्यंत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नसल्याची भूमिका रविकांत तुपकरांनी घेतलीय.


काय आहेत मागण्या?


सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची राज्य आणि केंद्र सरकारने फसवणूक केली असल्याचा तुपकरांनी म्हटलं होतं. हजार शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून रस्त्यावर उतरत आहोत. सरकारने वेळोवेळी आमच्यासोबत चर्चा, बैठका केल्या. सरकारने आम्हाला आश्वासनं दिली, त्यांनी आमची फसवणूक केली आहे. कापसाला, सोयाबीनला दरवाढ मिळत नाही. 70 ते 80 टक्के सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. तरीही सरकार चर्चा करायला तयार नसल्याचं तुपकरांनी सांगितले होतं. तसेच, अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याच तुपकरांनी म्हटलं होतं. 


शेतकरी प्रश्नावरुन तुपकर आक्रमक


गेल्या काही दिवसांपूर्वी रविकांत तुपकरांनी कापूस, सोयाबीन आणि पीकविम्याच्या प्रश्नांवरुन आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांकडून तुपकर यांचा शोध सुरू होता. आंदोलनाचा इशारा देऊन तुपकर भूमिगत झाले होते. शनिवारी (11 फेब्रुवारी) तुपकर येण्याआधीच शेकडो कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमले होते. तुपकर पोलिसी वेशात येताच, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा गदारोळ झाला आणि पोलिसांची धावपळ उडाली. तुपकरांना आत्मदहनापासून रोखल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरच ते आंदोलनला बसले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तुरुंगातही अन्नत्याग आंदोलनावर ठाम