Buldhana News : उकळत्या दुधाच्या कढईत चिमुकली पडली. अंगाची प्रचंड लाहीलाही झाली असेल तिच्या. कुटुंबीयांनी उपचारही केले, मात्र तिने उपचारांना प्रतिसाद दिला नाही, अखेर तिचा मृत्यू झाला. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्याच्या मलकापुरातील (Malkapur) जाधववाडी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. ओमश्री युवराज जाधव (वय 6 वर्षे) असे त्या दुर्दैवी चिमुकलीचे नाव आहे.


ही घटना 21 दिवसांपूर्वी घडली होती. मात्र काल (18 मे) उपचारादरम्यान ओमश्री जाधव या चिमुकलीचा मृत्यूशी सुरु असलेली झुंज अपयश ठरली आणि तिने अखेरचा श्वास घेतला.


घरासमोरील उकळत्या दुधाच्या मोठ्या कढईत पडली


मलकापूर शहरातील हनुमान चौकात ओमश्रीचे वडील युवराज जाधव यांची डेअरी आहे. ते कुटुंबासह नांदुरा रोडवरील जाधववाडी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरासमोरील आवारात नेहमीप्रमाणे मोठ्या कढईत दूध उकळण्यासाठी ठेवले होते. घटनेच्या दिवशी ओमश्री भावंडासोबत खेळता खेळता अनावधानाने दुधाच्या कढईत पडली. 


21 दिवस मृत्यूशी झुंज, अखेर काल प्राण सोडले


ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच तिला तात्काळ बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले. तिथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी तिला जळगाव (खान्देश) येथे नेण्यात आले. मात्र ओमश्रीची प्रकृती गंभीर असल्याने तिला तातडीने मुंबईत नेण्यात आले. तिथे तिच्यावर एकापाठोपाठ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शेवटपर्यंत तिची मृत्यूशी झुंज सुरु होती. अखेर तीन आठवडे उपचार करुनही तिच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही. अखेर 21 दिवसांनी तिचा मृत्यूशी सुरु असलेला संघर्ष संपला आणि काल सकाळी तिचं निधन झालं. या घटनेमुळे मलकापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे.


यवतमाळमध्ये अंगावर भिंत पडून चिमुकल्याचा अंत


दरम्यान यवतमाळमध्ये अंगावर भिंत कोसळून सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. विहान अमोल श्रीवास (वय 7 वर्षे रा. महानंदा नगर यवतमाळ) असं मृत बालकाचं नाव आहे. विहान हा आर्णी रोडवरील जयांड्स इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता तिसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. दररोज तो ऑटोरिक्षाने शाळेत जात असे. नेहमीप्रमाणे विहान हा शाळेत जाण्यापूर्वी रोजच्या ऑटोरिक्षाची वाट पाहत होता. वेळ असल्याने घराकडे परत जाण्यासाठी निघाला. यावेळी महानंदा नगर वसाहत असे लिहिलेली भिंती त्याच्या अंगावर अचानक कोसळली. यावेळी विहानचे वडील हे काही अंतरावरच होते. त्यांच्या समक्ष सर्व प्रकार घडल्याने त्यांनी आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी दाखल होऊन कोसळलेल्या भिंतीचा ढिगारा बाजूला करुन विहानला बाहेर काढले. त्यानंतर तात्काळ त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र विहानला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.