Maharashtra Buldhana News : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातील संग्रामपूर पंचायत समितीसमोर आपल्या वरवट खंडेराव या गावातील समस्यांसाठी 14 ऑगस्ट रोजी उपोषणाला बसलेले संतोष गाळकर हे अचानक 15 ऑगस्टच्या मध्यरात्री उपोषणस्थळावरून गायब झाले होते. दुसऱ्या दिवशी ही बाब समोर येताच संतोष यांच्या मुलानं वडील बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दिली होती. गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असलेले संतोष गाळकर हे काल संध्याकाळी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पिंप्री जैन गावाजवळ एका झाडाखाली सापडले. ते आजारी होते. या गावातील नागरिकांनी तात्काळ संतोष गाळकर यांच्या नातेवाईकांना फोनवरून माहिती दिली. नातेवाईकांनी संतोष यांना उपचारासाठी शेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात भरती केलं असून संतोष हे सध्या काही बोलण्याच्या स्थितीत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. आपल्या न्याय मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले संतोष गाळकर हे अचानक बेपत्ता कसे झाले? आपला चष्मा, कपडे, चप्पल उपोषणस्थळी सोडून ते कुठे गेले होते का? त्यांना कुणी नेलं होतं? ते बेपत्ता होण्यामागे काय करणं होती? याचा शोध आता पोलिसांनी घेणं आवश्यक आहे. 


प्रकरण नेमकं काय? 


बुलढाण्यातील वरवट खंडेराव गावातील ग्रामपंचायतीच्या स्ट्रीट लाईट, नाली बांधकाम इत्यादी कामात ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अविनाश येनकर यांनी भ्रष्टचार केला म्हणून गावातील सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. पण त्यांच्या तक्रारींची दखल कोणीच घेतली नाही. चौकशी नाही, कारवाई नाही, म्हणून सामाजिक कार्यकर्ते संतोष गाळकर यांनी संग्रामपूर पंचायत समिती समोर उपोषण करणार असल्याचं रीतसर प्रशासनाला कळवलं. त्यांनी एकट्यानंच उपोषण सुरू केलं. 14 ऑगस्टला संतोष गाळकर पावसाळी दिवस असल्यानं त्यांच्या स्वतःच्या पिकअप गाडीतच पंचायत समिती प्रवेशद्वारावर उपोषणाला बसले. त्यांनी आपल्या मागण्या प्रशासनाला पंधरा दिवस आधीच कळविल्या होत्या. 


उपोषणाच्या पहिल्या दिवशी संतोष गाळकर यांच्या उपोषणाची पंचायत समिती प्रशासनानं दखल घेतली नाही. दुसऱ्या दिवशी स्वातंत्र्य दिन होता, त्या दिवशीही दखल घेतली नाही. 15 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर संतोष गाळकर हे त्यांच्या उपोषणस्थळाहुन बेपत्ता असल्याचं निदर्शनास आलं. संतोष हे ज्या गाडीत उपोषणाला बसले होते, त्या गाडीत त्यांचे कपडे, चप्पल, चष्मा, मोबाईल अशा सर्व वस्तू गाडीतच आढळून आल्या. म्हणून नातेवाईकांनी, मित्र मंडळींनी सर्वत्र शोध घेतला, मात्र सायंकाळपर्यंत त्यांचा काहीच पत्ता न लागल्यानं त्यांच्या मुलानं तामगाव पोलिसांत वडील उपोषणस्थळातून बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तात्काळ पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य बघून तक्रार दाखल करून दोन पथकं संतोष यांच्या शोधासाठी रवाना केली. तब्बल पाच दिवसांनी संतोष गाळकर सापडले ते थेट अकोल्यात. तेही आजारी अवस्थेत. 


संतोष गाळकर यांच्या गायब होण्याचं अद्याप उलगडलं नाही. त्यामुळे ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आहे. संतोष यांचा मुलगा सुपेश गाळकर यानं आपल्या वडिलांच्या बेपत्ता होण्यामागे ग्रामसेवक अविनाश येनकर आणि पंचायत समिती प्रशासनाचा हात असल्याचा आरोप केला आहे. तसेच, गट विकास अधिकारी संजय पाटील म्हणतात, ते गायब कसे झाले, आम्हाला काही माहिती नाही आणि त्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Buldhana News : बेपत्ता सामाजिक कार्यकर्त्याच्या शोधासाठी कुटुंबीय, ग्रामस्थांचा गट विकास अधिकाऱ्याच्या दालनात ठिय्या