बुलढाणा, खामगाव :  ज्या वयात आपल्या नातवंडांना खेळवाचं दिवस असतात. सुखा समाधानाने जगायचे दिवस असतात. त्या वयात काही वयोवृद्ध शेतकरी उपोषणाला बसले आहेत. कडाक्याच्या थंडीत या ज्येष्ठ शेतकऱ्यांना आमरण उपोषणाला बसायची वेळ का आली आहे.? नेमके का हे ज्येष्ठ शेतकरी उपोषणाला बसले आहेत...?  " खामगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा " अशी त्या शेतकऱ्यांची मागणी आहे. 1972 नंतर अशी परिस्थिती पहिल्यांदाच आली आहे, असे त्या वयोवृद्ध शेतकऱ्यांचं मत आहे. जवळपास 200 वयोवृद्ध शेतकरी उपोषणाला बसलेत. पण सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नाही. 


बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव या गावात " खामगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात यावा " , दुष्काळी परिस्थितीत ज्या घोषणा सरकारकडून करण्यात येतात , त्या घोषणा जाहीर करण्यात याव्यात. या मागणीसाठी गाव व परिसरातील वयोवृद्ध शेतकऱ्यांनी गावातील ग्राम पंचायती समोर आमरण उपोषण सुरू केलं आहे . परिसरातील जवळपास 200 च्या वर ज्येष्ठ शेतकरी महिला व पुरुष या उपोषणात सहभागी झाले आहेत. 1972 नंतर इतक्या मोठ्या प्रमाणात परिसरात दुष्काळ पडल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आपल्या परिसरातील मागण्यांसाठी ज्येष्ठांना उपोषण करण्याची परिसरातील पहिलीच घटना असल्याने अनेक नागरिकही या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी येत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून हे उपोषण सुरू असून अद्याप प्रशासनाने याची दखल घेतली नाहीये. 


गेल्या तीन दिवसापासून कडाक्याच्या थंडीत दिवस रात्र हे दीडशे ते दोनशे शेतकरी ज्यांचं वय साठीच्या वर आहे. या ठिकाणी आंदोलनाला व आमरण उपोषणाला बसले आहेत. ज्येष्ठ शेतकरी उपोषणाला बसल्याने या परिसरातील तरुण शेतकरीही आता या आंदोलनात पाठिंबा द्यायला सरसावले आहेत. मात्र अद्यापही प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी या ज्येष्ठ नागरिकांच्या आमरण उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या या आमरण उपोषणाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही पाठिंबा दिला असून उद्यापासून अनेक स्वाभिमानीचे कार्यकर्ते या ज्येष्ठ नागरिकांच्या आमरण उपोषणात सहभागी होणार आहेत....


दरम्यान, ज्येष्ठांच्या या आंदोलनाची "एबीपी माझा" ने उपोषण स्थळी जाऊन दखल घेतल्याबद्दल या ज्येष्ठ शेतकऱ्यांनी "एबीपी माझा"चे आभारही मानले आहे..