बुलढाणा: बुलढाण्यात वर्ग शिक्षकाने रागवल्याच्या कारणावरून दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या (Buldhana Crime News) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्याने जीवन संपवण्याआधी "सुसाईड नोट" लिहली आहे. या घटनेने बुलढाण्यात हळहळ व चिंता व्यक्त केली जात आहे. वर्ग शिक्षकाने वर्गात काही प्रश्न विचारले असता उत्तर आले नाही. त्यावरून वर्ग शिक्षक रागावले व तुझ्या आई-वडिलांना तू अभ्यास करत नाही, हे मी सांगेन असं म्हणत रागावल्याच्या कारणावरून दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सुसाईड नोट (Buldhana Crime News) लिहीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत विद्यार्थी विनायक महादेव राऊत (वय 15, रा. वसाडी बु.) हा जय बजरंग विद्यालयात दहावीमध्ये शिक्षण घेत होता. (Buldhana Crime News)
नेमकं काय घडलं?
नांदुरा तालुक्यातील वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयात ही धक्कादायक व तितकीच चिंता वाढविणारी घटना घडली आहे. नुकत्याच शाळा सुरू झाल्या व वसाडी गावातील जय बजरंग विद्यालयातील विद्यार्थी विनायक महादेव राऊत हा दहावी शिकत होता. काल शाळेत शिक्षकांनी वर्ग सुरू असताना विनायकला अभ्यासाबद्दल काही प्रश्न विचारले. मात्र त्याबद्दल त्याला उत्तर देता न आल्याने शिक्षकांनी त्याला रागावले व तुझ्या आई-वडिलांना मी सांगेन असं म्हटलं यावरून मधल्या सुट्टीत विनायकने गावाजवळीलच शेतात जाऊन गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोटही लिहीली. यामध्ये सुर्यवंशी या वर्ग शिक्षकाने मला रागवले, आई-वडिलांवरूनही बोललेत त्यामुळे मी फाशी घेत आहे, असं लिहिलं आहे . या घटनेमुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे व चिंता ही व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पिंपळगाव राजा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून संबंधित सूर्यवंशी नावाच्या शिक्षकाला ताब्यात घेतलं आहे.विनायकने आपलं जीवन संपवण्याआधी त्यामागं काय कारण आहे, त्याबाबतची सुसाईड नोट लिहून ठेवली होती. खिशात सापडलेल्या चिठ्ठीत शिक्षक सूर्यवंशी यांनी मानसिक छळ केला, तसेच त्याच्या पालकांविषयी अपशब्द वापरून अपमान केल्याचे नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला विचारला जाब
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत शिक्षकाला जाब विचारला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शिक्षक सूर्यवंशींना ताब्यात घेतले आहे. ग्रामस्थांनी सांगितले की, संबंधित 3 शिक्षक यापूर्वीही अशाच प्रकारे गैरवर्तन करत होते. त्याविरोधात तक्रार करूनही केवळ बदली करून पुन्हा वसाडी येथेच नियुक्ती करण्यात आली होती. या प्रकरणी पिंपळगाव राजा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.