बुलढाणा : शासनाच्या 'सरकार आपल्या दारी'ला (Shasan Applya Daari) प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या वतीने जनाधिकार जनता दरबार कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांच्या उपस्थितीत आज बुलढाणा (Buldhana) शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शेतकरी भवन येथे जनाधिकार जनता दरबार भरवण्यात आला होता. यावेळी जिल्हा व शहरातील नागरिकांनी हजेरी लावत आपल्या तक्रारी मांडल्या. यावेळी एकूण 250 प्रकरणाच्या तक्रारी यावेळेस नागरिकांनी अंबादास दानवे यांच्यासमोर मांडल्या. 


बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरलेल्या जनता दरबाराला सकाळी 10 वाजेपासून सुरवात झाली आणि दुपारी 2 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालला. यादरम्यान पीक विमा, प्रोत्साहन अनुदान व शेतकरी कर्जमाफी ह्या तक्रारी प्रामुख्याने आढळून आल्या. संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजना अशा विविध योजनांच्या लाभाबाबतीत अडचणी नागरिकांनी अंबादास दानवे यांच्या समोर मांडल्या. यावेळी स्वतः संबंधित अधिकार्‍यांना संपर्क करून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विविध तक्रारी मार्गी लावल्या. ज्या जागेवरून सोडविल्या जाऊ शकत नव्हत्या अशा प्रकरणांना  मार्गी लावण्यासाठी पत्रे देऊन संबंधित विभागाला सुचना करण्यात आल्या आहेत.


एक फोन कॉल अन् प्रॉब्लेम सॉल...


याचवेळी आलेल्या एका तक्रारीनंतर जिल्ह्यातील धरणातून होत असलेल्या अवैध वाळू उपसा विरोधात तहसीलदार यांना फोन करून तात्काळ हे बेकायदेशीर काम थांबवण्यात यावे आणि कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी, सुचना दानवे यांनी केली. तसेच, 2016 साली घरकुलासाठी अर्ज दाखल केला होता परंतु अद्याप पर्यंत लाभ मिळावा नसल्याचे एका तक्रारदाराने तक्रार केली. त्याविरोधात तात्काळ कार्यवाही करत संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला.


शेतकरी शासकीय लाभापासून वंचित 


वित्तीय वर्षाच्या शेवटच्या म्हणजे 31 मार्चपर्यंत घेतलेले कर्ज परत केले, तर शासकीय कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळतो अशी राज्यातील शेतकर्‍यांची मानसिकता आहे.परंतु ज्या दिवशी शेतकरी कर्ज घेतो त्याच्या आदल्या दिवसापर्यंत कर्ज परत करावे लागते याची माहिती शेतकर्‍यांना नाहीच. त्यामुळे राज्यातील व बुलढाणा जिल्ह्य़ातील शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहतात अशी माहिती एका शेतकर्‍यांने दानवे यांच्या निदर्शनास आणून दिले. आपला विषय मला समजाला असून हा महत्वपूर्ण प्रकरण आगामी अधिवेशनात मी मांडतो, तसेच तात्काळ स्वरुपात याचे निराकरण कसे करता येईल असे आश्वासन यावेळी त्यांनी शेतकर्‍यांना दिले.


मोठ्या प्रमाणात तक्रारदार उपस्थित...


महिला, पुरुष, तरुण, तरुणी व वयस्कर अशा सर्व वयोगटातील नागरिकांनी याठिकाणी हजेरी लावून आपल्या तक्रारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख नरुभाऊ खेडेकर, जिल्हाप्रमुख जालीधर बुधवत, वसंतराव भोजने, सुनील घाटे,महिला आघाडी जिल्हा संघटक जिजाबाई राठोड,तालुकाप्रमुख दीपक चांभारे, लखन गाडेकर,गोपालसिंह बच्छिरे, अशोक इंगळे,गणेश बोसरे,सुधाकर सुरडकर व संजीवनी वाघ उपस्थित होते.


इतर महत्वाच्या बातम्या: 


राजू शेट्टींना काय वाटतं महत्वाचं नाही, आमचा नेता हा शेतकरी, बुलढाणा लोकसभा लढवणारचं : रविकांत तुपकर