बुलडाणा : बुलडाण्यातील भेंडवळमधील भविष्यवाणीला सुरुवात झाली आहे. आज पुंजाजी वाघ, शारंगधर वाघ यांनी सकाळी घटस्थापना करुन भविष्यावाणीला सुरुवात केली. त्यानुसार यंदा पाऊस साधारण स्वरुपात चांगला राहील.


 

लहरी पावसासह अतिवृष्टीचा इशारा

 

पहिला महीना साधारण पण लहरी पाऊस. दुसऱ्या महिन्यात चांगला पाऊस, अतिवृष्टी संभवते, तर तिसऱ्या महिन्यात चांगला पाऊस अतिवृष्टीही होईल, असा अंदाज भविष्यवाणीत मांडण्यात आला आहे.

 

चारा-पाणी टंचाईचं संकट

 

देशावर चारा-पाण्याची टंचाई येईल. मूग आणि उडीद पिकांची काही भागात नासाडी, तीळ पिक साधारण असेल, पण नासाडीही होईल, असंही भविष्यवाणीत वर्तवण्यात आलं आहे. तांदूळ, जवस यांची नासाडी होण्याचंही यात म्हटलं आहे. तर गहू, हरभरा पिकांच्या भावात तेजी मंदी राहील.

 

देशाच्या संरक्षण खात्यासमोर आव्हानं!

 

देशाच्या संरक्षण खात्यावर ताण येईल. शिवाय, परकीय घुसखोरीचं आव्हानही देशासमोर असेल. त्यामुळे सैन्यासमोरील आव्हानं वाढतील, असंही भेंडवळच्या भविष्यवाणीत म्हटलं आहे.

 

पंतप्रधानांसाठी वर्ष चांगले नाही!

 

देशात आर्थिक तणाव राहील. देश आर्थिक संकटात येईल. पंतप्रधानांना हे वर्ष बरे नाही. त्यांच्यावर अनेक राजकीय आणि आर्थिक संकटं येतील, असेही या भविष्यवाणीत म्हटलं गेलं आहे.

 

भेंडवळमध्ये भविष्यवाणी कशी केली जाते?

 

भेंडवळची घट मांडणी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सायंकाळी करण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात घटाची आखणी करुन, त्यात घागर, मातीचे ढेकळे, पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ बाजरी, तांदूळ, अंबाडी, वाटाणा, सरकी, मसूर, करडी असे एकूण 18 प्रकारच्या धान्याची प्रतिकात्मक मांडणी केली जाते. पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं.