बीड: सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणी पुढील सुनावणी 24 मार्च रोजी पार पडणार आहे. एका आरोपीकडून भावाच्या मृत्यूनंतर धार्मिक विधीसाठी घरी जाण्याचा विनंती अर्ज करण्यात आला आहे, तर याबाबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार कोण? असा सवाल धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या (Beed News) जिल्हा व विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान डिजिटल इलेक्ट्रॉनिक पुरावे आरोपी पक्षाला दिले जावे याबाबत न्यायालयाने सरकारी पक्षाला सूचना केल्या आहेत. तर या प्रकरणात आरोपीच्या वकिलांकडून दिरंगाई होत असल्याचा आरोप विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी केला. याच युक्तीवादावरून निकम आणि आरोपीच्या वकिलात न्यायालयामध्ये खडाजंगी झाली.
तर यातील आरोपी जयराम चाटेकडून भावाच्या मृत्यूनंतर धार्मिक विधीसाठी घरी जाण्यास परवानगी मागण्यात आली. यावर सरकारी पक्षाने आक्षेप घेतला नाही. परंतु याबाबत धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर जबाबदार कोण? असा देखील सवाल उपस्थित केला. तर वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड याने फेसबुक पोस्ट न करता पत्रकार परिषद घेऊन हे नेमकं कसे घडले? कुणामुळे घडले? याला कुणाचे पाठबळ होते? हे सांगावे परंतु आता त्यांच्या पोस्ट थांबल्या आहेत. या मागे काही गणित गुपित असू शकते. हे न्यायालयासमोर अद्याप आल्या नाहीत. त्यांना बोलण्यासाठी पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. आम्ही व्यक्त होत आलो आहोत. पुढील सुनावणी आता 24 मार्च रोजी होणार आहे.
वाल्मीक कराडच्या मुलाने फेसबुकवरती केलेल्या पोस्टबाबत धनंजय देशमुख म्हणाले की, ते सगळं बंद झालं आहे. मी पहिल्याच पोस्टवर बोललो होतो, त्यानंतर मला बोलावंही वाटलं नाही, आणि मी बोलणारही नाही, त्यांनी पहिली पोस्ट केली त्यावेळेस मी सांगितलं होतं, माध्यम आहेत, ते सर्वांसाठी आहेत, आता पूर्णपणे बोलायचं सगळं बंद झाला आहे, आता म्हणूनच मी म्हणत होतो पोस्ट करण्यापेक्षा एक प्रेस कॉन्फरन्स घेतली तर लोकांना कळेल, हे सगळं कसं घडलं, कोणामुळे घडलं, आणि कोणाचे एवढे पाठबळ होतं, परंतु आता ते सगळं बंद झालं. मला सगळं माहिती होतं. म्हणूनच मी सांगितलं होतं. हे थांबणार आहे. एका वाक्यात आणि एका शब्दात सगळा विषय संपलेला होता. या मागं एखादा गणित असू शकते, कारण काही गोष्टी पेपरवर आलेल्या नसल्या काही गोष्टी कोर्टात आलेल्या नसल्या तरी त्या अस्तित्वात आहेत आणि त्या आम्ही वेळोवेळी आमच्याकडून व्यक्त केल्या आहेत, त्याचे पुरावे देखील आम्ही दिलेले आहेत, त्यामध्ये काहीतरी वेगळं गणित किंवा गुपित असणार आहे, ते का थांबले किंवा का थांबवला आहे? हे सांगणं कठीण आहे असेही पुढे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
