Police Recruitment Exam: बीड जिल्ह्यात 22 फेब्रुवारी रोजी पोलीस पाटील भरतीची लेखी परीक्षा पार पडली; मात्र परीक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीच्या संचाची प्रश्नपत्रिका देण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने गोंधळ निर्माण झाला. प्रशासनाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर संबंधित प्रश्नपत्रिका बदलण्यात आली, पण तोपर्यंत उमेदवारांचा बराच वेळ निघून गेला होता. त्यामुळे प्रशासनाच्या चुकीची शिक्षा उमेदवारांना भोगावी लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे.

नेमके प्रकरण काय?

बीड जिल्ह्यात 22 फेब्रुवारी रोजी पोलीस पाटील भरतीची लेखी परीक्षा पार पडली. परंतु याच परीक्षेत काही उमेदवारांना चुकीच्या संचाची प्रश्नपत्रिका देण्यात आली. ही बाब तेथील प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर प्रश्नपत्रिका बदलण्यात आली. मात्र तोपर्यंत पेपर सोडविण्याचा बराच वेळ निघून गेला होता. त्यामुळे प्रशासनाच्या चुकीची शिक्षा उमेदवारांना भोगण्याची वेळ आली.

या संदर्भात सुकन्या राठोड या महिला उमेदवाराने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही बाब अधिकृतरीत्या मांडली आहे. ज्या उमेदवारांना चुकीच्या संचाची प्रश्नपत्रिका देण्यात आली, त्यांच्या परीक्षा पुन्हा घेण्यात याव्यात, अशी स्पष्ट मागणी करण्यात येत आहे. उमेदवारांच्या म्हणण्यानुसार, वेळ वाया गेल्यामुळे त्यांच्या कामगिरीवर थेट परिणाम झाला असून हा अन्याय दूर करणे आवश्यक आहे.

प्रश्नपत्रिकाचा गोंधळ,फेरपरीक्षेची मागणी

जिल्ह्यातील पोलीस पाटील पदासाठी एकूण 11 हजार 325 जागांसाठी परीक्षा घेण्यात आली होती, तर 10 हजार 886 उमेदवार परीक्षेला उपस्थित होते. अंबाजोगाई येथील परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिकेबाबतचा हा गोंधळ उघडकीस आला. प्रश्नपत्रिका बदलण्यात आली असली तरी उमेदवारांचा मौल्यवान वेळ गेला असल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

दरम्यान, संबंधित उमेदवारांची फेरपरीक्षा घ्यावी आणि 2 मार्च रोजी जाहीर होणारा अंतिम निकाल स्थगित ठेवावा, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे. प्रशासनाच्या चुकीची शिक्षा उमेदवारांना का भोगावी, असा सवालही उपस्थित केला जात आहे. आता या प्रकरणावर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.