बीड: आतापर्यंत बीड लोकसभा ही प्रितम मुंडे (Pritam Munde) याच लढवतील असं स्पष्टपणे सांगणाऱ्या पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) आता याबाबतचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठी घेतील असं वक्तव्य केलं आहे. पंकजा मुंडे यांनीच निवडणूक लढवावी अशी भाजप नेतृत्वाची इच्छा असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यावर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


पंकजा मुंडे यांच्या या ताज्या वक्तव्यानंतर आधी बीडची लोकसभा ही प्रितम मुंडेच लढतील आणि आपण राज्याच्या राजकारणात सक्रिय असून असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका बदलली का असा प्रश्न विचारला जात आहे. 


पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत आष्टीमध्ये बूथप्रमुखांच्या संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी बीड लोकसभा निवडणुकीचा उमेदवार पक्षश्रेष्ठी ठरवतील असं वक्तव्य केलं. तसेच कोणत्याही आरक्षणाच्या आंदोलनाचा निवडणुकीवर धोकादायक परिणाम होणार नसल्याचं पंकजा मुडे म्हणाल्या. 


लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या बूथ रचना केली जात आहे आणि या कामाला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. 2014 आणि 19 मध्ये याच कार्यकर्त्यांनी माझ्या बाजूने चांगलं काम केलं होतं, त्यामुळे उमेदवार कोण असेल हे येणाऱ्या काळात निश्चित होईल असं त्या म्हणाल्या. 


आरक्षणाच्या आंदोलनाचा निवडणुकांवर परिणाम नाही 


राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे आणि याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर तेवढ्या प्रमाणात धोकादायक परिणाम होणार नाही असं पंकजा मुंडे म्हणाल्या. राज्य सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण दिलं आहे त्या आरक्षणाचा मराठा समाजाने विरोध केला आहे. यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मराठा समाजाने ठरवावं आरक्षण हवं आहे की नाही? यावर अनेकदा मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे असं म्हणत त्यांनी यावर भाष्य करण टाळलं.


येणारा काळ महिलांचा, महिला स्पष्ट आणि सत्याचं राजकारण करतील


राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी येणारा काळ चांगला आहे, कारण येत्या काळात महिलाच या स्पष्ट आणि सत्याचं राजकारण करतील असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तर येणाऱ्या काळात एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल अस देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. 


ही बातमी वाचा :