जालना: ओबीसी समाजाचा जालन्यातील अंबड तालुक्यात मोठा मेळावा (Jalna OBC Melava) पार पडला. या मेळाव्याला प्रत्येक पक्षाचे ओबीसी नेते आले होते. पंकजा मुंडे (Pankaja Munde) या मेळाव्यात येतील, अशी आशा व्यक्त केली जात होती. पण पंकजा मुंडे या कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. अखेर पंकजा मुंडे यांनी त्यामागील कारण सांगितलं. मेळाव्याला जाण्यासाठी माझ्या पक्षाने मला परवानगी दिली नाही असं त्या म्हणाल्या.


जिल्ह्यातील अंबड येथे झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव सभेसाठी पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती होती. पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीनंतर त्यावरून चांगलीच राजकीय चर्चा रंगली होती. त्यानंतर याच विषयावर बोलताना पंकजा मुंडे यांनी ओबीसी आरक्षण बचाव सभेसाठी जायला माझ्या पक्षाने मला परवानगी दिली नाही अशी प्रतिक्रिया दिली. तर या सभेमध्ये छगन भुजबळ यांचं प्रमुख भाषण होणार होतं आणि त्यावर त्यांनी आपली ओबीसी आरक्षणावरची भूमिका मांडली असल्याचा देखील पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.


दोन जातींमध्ये कधीही भिंत उभी केली नाही


ओबीसीची जनगणना व्हावी अशी भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी मांडली होती आणि या भूमिकेचे सर्वांनी स्वागत केलं होतं असं सांगत पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे यांनी दाखवलेल्या मार्गावरच मी सध्या काम करत असून माझं राजकारण हे गरिबांसाठी आणि वंचितांसाठी आहे. मी दोन जातींमध्ये कधीच भिंत निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणार पण नाही. मला ओबीसीच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी आमंत्रणाची गरज नसून मी बहुजनांच्या बाजूने आहे. 


जालन्यात ओबीसी महाएल्गार सभा


मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी जालन्यातील अंबडमध्ये ओबीसी नेत्यांची जाहीर सभा झाली. ओबीसीमधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नये यासाठी सर्वात आधी मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांना इतर ओबीसी नेत्यांचा देखील पाठिंबा मिळाला. जालन्यातील सभेत छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली. त्यानंतर जरांगे यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं.


ही बातमी वाचा: 



Video : OBC महाएल्गार सभेला जाण्याची माझ्या पक्षाने परवानगी दिली नाही