Laxman Hake Car Attacked बीड: गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. मात्र, लक्ष्मण हाकें यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे.
गेवराईत लक्ष्मण हाके यांच्या पुतळ्याचं काल दहन करण्यात आलं होतं. त्याच चौकात लक्ष्मण हाके आलेले आहेत. याच ठिकाणी विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते देखील जमले आहेत. चप्पल भिरकावण्यात आल्याचं पाहायला मिळालं. लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचं दिसून आलं. लक्ष्मण हाकेंच्या गाडीची पुढील काच फुटल्याचं पाहायला मिळालं. गेवराईतील शिवाजी महाराज चौकात हा सगळा प्रकार सुरु आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेवराई बॅनर लावण्यात आले होते. त्या वरून हा गोंधळ आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराईत सुरु असलेला जमाव पांगवण्याचा आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत आहे. लक्ष्मण हाके छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचल्यानंतर लक्ष्मण हाके आणि विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. यावेळी दोन्ही बाजूनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
गेवराई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन लक्ष्मण हाके यांनी विजयसिंह पंडित यांना आव्हान दिलं होतं. विजयसिंह पंडित यांचे मनोज जरांगे यांना समर्थन देणारे बॅनर लागले होते. त्यावरुन वाद झाला होता. लक्ष्मण हाके यांच्या गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. या वादात चप्पल भिरकवण्यात आली, दगडफेक करण्यात आली, दंडुक्याची भाषा वापरण्यात आली. यानंतर या ठिकाणावरील परिस्थिती चिघळली होती. पोलिसांनी त्या ठिकाणावरुन लक्ष्मण हाके यांना बाहेर काढून बीडच्या दिशेनं रवाना केलं. या राड्यात लक्ष्मण हाकेंना देखील मारहाणीचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. आमदार विजयसिंह पंडित यांचे कार्यकर्ते या चौकात दोन्ही बाजूला थांबलेले दिसून येत आहेत. या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला. गेवराई शहरात दोन्ही गट आक्रमक झालेले होते.
विजयसिंह पंडित काय म्हणाले?
लक्ष्मण हाके हे समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचं कुटील कारस्थान बीड जिल्ह्यात येऊन सुरु आहे. तीन चार दिवसांपूर्वी खालच्या पातळीवर जाऊन माझ्या विरोधात प्रतिक्रिया दिली. ती प्रतिक्रिया दिल्यानंतर त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही. चिथावणीखोर वक्तव्यांना आमच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे, असं विजयसिंह पंडित म्हणाले. जरांगेनंना समर्थन दिल्यानं समाजासमाजात तेढ निर्माण होण्याचा काय प्रश्न असं विजयसिंह पंडित म्हणाले.