Beed: बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या शिरूर घाट येथील दीपक सांगळे याच्यासह त्याचे सात मित्र असे एकूण आठ तरुण नेपाळमध्ये फिरायला गेले असता त्यांची लुटमार झाली आणि ते त्या ठिकाणी अडकले. मात्र धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे त्यांची सुटका झाली असून ते सुखरूप आहेत आणि लवकरच आपापल्या घरी पोहोचतील.


मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर घाट येथील दीपक जीवन सांगळे याच्यासह महेश हरकर, विश्वजीत घुले, किरण चव्हाण, आकाश खामकर, अक्षय पारेकर, अविष्कार मुळीक व सुरज लोंढे हे आठ तरुण फिरायला नेपाळमध्ये गेले होते. दरम्यान सोमवारी रात्री काठमांडू शहरातील तामिल परिसरात फिरत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील सर्व पैसे तसेच त्यांच्या अकाउंटवरील पैसे सुद्धा जबरदस्तीने ऑनलाइन घेतले आणि त्यांना मारहाण करून सोडून दिले. 


घाबरलेले आठही तरुण जवळच्या पोलीस ठाण्यात गेले, मात्र तिथेही त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही. तेव्हा त्यांनी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना पोलीस ठाण्यातील वायफाय वापरून व्हाट्सअप कॉल केला आणि रडत मदतीची याचना केली. धनंजय मुंडे यांनी संबंधित तरुणांना धीर दिला तसेच तात्काळ मदतीचे आश्वासन दिले.


त्यानंतर अपघातग्रस्त असूनही धनंजय मुंडे (dhananjay munde) यांनी एक ट्वीट करत परराष्ट्र मंत्री डॉ. जय शंकर, नेपाळमधील भारतीय दूतावास, नेपाळ पोलीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजितदादा पवार आदींना याबाबत माहिती दिली. तसेच फोनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार यांच्या कार्यालयासही या तरुणांना मदत करण्याबाबत विनंती केली. 


बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनाही याबाबत माहिती देत मुलांच्या सुटकेसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही क्षणातच यंत्रणा कामाला लागल्या. नेपाळमधील भारतीय दूतावास व गृह विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट संबंधित पोलीस ठाणे गाठून तरुणांशी संपर्क साधला व त्या तरुणांच्या जीवात जीव आला.


दरम्यान, त्या तरुणांची लूट करणाऱ्या दोन चोरट्यांना देखील नेपाळ पोलिसानी अटक केली असून, सर्व 8 तरुण सध्या सुखरूप आहेत व भारतीय शासकीय यंत्रणेमार्फत त्यांची तामील (काठमांडू) येथील अग्रवाल भवन येथे राहणे व अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित तरुणांना परत येण्यासाठी तिकिटासह सर्व व्यवस्था करण्यात येत असून लवकरच ते सर्वजण भारतात आपापल्या घरी सुखरूप पोचतील.