Beed Shirur Bandh: शिरुर : अहमदनगरच्या (Ahmednagar News) पाथर्डी तालुक्यातील (Pathardi Taluka) शिरापूर येथील एका युवकानं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यावरून संपूर्ण जिल्ह्यासह बीडमध्येही मोठा तणाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी आक्षेपार्ह्य पोस्ट करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली. पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. याच पार्श्वभूमीवर काल (शुक्रवारी) सकल ओबीसी समाज आणि सकल वंजारी समाजाच्या वतीनं पाथर्डी बंदची हाक दिली होती, तर आज बीड जिल्ह्यातील शिरूर कासार शहर बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. 


शिरूर तालुक्यातील रायमोहा येथे एकानं आक्षेपार्ह्य पोस्ट केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज शिरूर शहर बंद करण्याचं आवाहन सकल वंजारा समाज आणि ओबीसी समाजाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, तणावाचं वातावरण, नेमकं काय घडलं? 


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांत बीडचा निकाल अत्यंत धक्कादायक होता. बीडमध्ये अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला. मराठा आंदोलनामुळे हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी दणदणीत विजय मिळवला. पण, परळीमध्ये पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची आघाडी मिळाल्याचं पाहायला मिळालं. 


बीडमधील परळी हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या मतदारसंघात धनजंय मुंडे आणि पंकजा मुंडे बहीण भाऊ एकत्र आल्यानंतर ताकद वाढली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंचा विजय पक्का असल्याचं बोललं जात होतं. बीड आणि गेवराई या दोन मतदारसंघात बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. या दोन मतदारसंघात पंकजा मुंडेंना मोठा फटका बसला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचा निकाल जाहीर झाला. निकाल स्पष्ट झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या संदर्भात एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट केली. आरोपीनं फेसबुकवर काही कार्यकर्ते नाचत असलेला एक व्हिडीओ पोस्ट केला. तसेच व्हिडीओखाली आक्षेपार्ह पोस्ट लिहिली. 


जालना-अंतरवली सराटीत मनोज जरांगे आज पुन्हा उपोषणाला बसणार


अंतरवाली सराटीमध्ये मनोज जारंगे पाटील पुन्हा एकदा म्हणजेच, चौथ्यांदा अमरण उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान अगोदरच पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. ग्रामस्थ आणि आजूबाजूच्या गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनावरून पोलिसांनी ही परवानगी नाकारली. म्हणून जरांगे पाटील हे आपल्या आंदोलनावरती ठाम असून ते दहा वाजता उपोषणाला बसणार आहेत.