मुंबई : चार दिवसांपूर्वी धाराशीवच्या कळंबमध्ये एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह सरपंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी ज्या महिलेचा वापर करण्यात येणार होता, तिचा असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या ना त्या कारणाने चर्चेत असलेल्या बीडमधून सतत काही नाही धक्कादायक गोष्टी बाहेर येत आहेत. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या करण्यात आल्याचा दावा केला जातोय. हा दावा केलाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी.
ही महिला पाच वेगवेगळ्या नावांनी वावरत होती, असा दावाही अंजली दमानिया यांनी केला आहे. दमानिया इथवरच थांबल्या नाहीत तर पोलिसांनी जागेवरच पोस्टमार्टेम केला आणि अंत्यविधी उरकला असा आरोपही दमानिया यांनी केला.
या सगळ्यावर धाराशिव कळंब शहर पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. या महिलेचा संतोष देशमुख प्रकरणाशी काही संबंध नाही. तसा काही संबंध असेल तर त्याचा तपास केला जाईल असं पोलिसांनी सांगितलं.
दरम्यान, देशमुखांची हत्या झाल्यावर त्यांची बदनामी करण्यासाठी त्यांचा मृतदेह एका महिलेकडे नेण्याचा प्लॅन होता असा आरोप मस्साजोगचे ग्रामस्थ आणि संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
कोण होती ती महिला?
- मनिषा कारभारी-बिडवे असं मृत महिलेचं नाव आहे.
- धाराशीवच्या कळंबमधील द्वारकानगरीत ती एकटीच राहत होती.
- ती खासगी सावकारी करत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
- तिची हत्या अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा संशय आहे.
- महिलेच्या डोक्याला मार लागल्यानं मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
एकीकडे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी कोर्टात खटला सुरू आहे. देशमुखांच्या मृत्यूचं गूढ पूर्णपणे उकलण्याचं आव्हान समोर असतानाच आता याप्रकरणी महिलेच्या संशयास्पद मृत्यूमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळताना दिसत आहे.
ही बातमी वाचा: