बीड : राज्यात 2029 सालच्या निवडणुकीत एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची असं वक्तव्य भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केल्यानंतर आता त्यावर महायुतीतील घटक पक्षाकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. देशातील इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येईल, पण महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार येऊ शकत नाही असं राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार म्हणाले. 


केंद्रीय मंत्री अमित शाहांनी मुंबईतील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यांना राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शन केलं. त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, येत्या निवडणुकीत महायुतीची सत्ता येणार. पण 2029 सालच्या विधानसभा निवडणुकीत एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची आहे. 


अमित शाहांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, सगळ्यांनाच आपापला पक्ष वाढवायचा आहे. पण महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार येऊ शकत नाही. महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. इतर राज्यांमध्ये एका पक्षाचे सरकार येऊ शकतं. मात्र महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. 1985 नंतर चाळीस वर्षात राज्यात एका पक्षाचे सरकार कधीच आलं नाही. 


कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अमित शाहांनी हे वक्तव्य केलं असेल. त्यांना त्यांचा पक्ष सिंगल लार्जेस्ट पक्ष करण्याचा अधिकार आहे असं अजित पवार म्हणाले.


तिसऱ्या आघाडीचे माध्यमांमधून समजतं 


अजित पवार तिसऱ्या आघाडीमध्ये जातील असं काहीजणांकडून म्हटलं जातं. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, मी तिसरा आघाडीचा चेहरा होईल असं सांगितलं जातं. पण हे ऐकून आमची करमणूक होते. आमचे आम्हालाच कळत नाही, आमची ब्रेकिंग न्यूज तिथे चालत असते. तिसरी आघाडी होईल, चौथी देखील होईल. त्यांचे उमेदवारी त्यांनी जाहीर केले आहेत. 


अमित शाहांच्या भाजप कार्यकर्त्यांना सूचना


केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबईमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीसंदर्भात काही सूचना दिल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर सक्रिय रहावे, प्रत्येक बूथवर भाजपचे 10 कार्यकर्ते असावेत अशा सूचना अमित शाहांनी दिल्या. तसेच शक्य तिथे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना फोडावे आणि भाजपमध्ये सामील करून घ्यावं अशा सूचनाही अमित शाहांनी दिल्या. 


ही बातमी वाचा :