Dhananjay Munde: भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार आणि नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या भगवानगडावर होणाऱ्या मेळाव्याला आज मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित राहणार आहे. तब्बल 12 वर्षांनंतर आज भगवान गडावरील दसरा मेळावानिमित्त (Pankaja Munde Dasara Melava 2024) एकत्र आले आहेत. धनंजय मुंडे यांनी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर मुंडे घराण्यात फुट पडली होती. त्यानंतर 2014 साली गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं. त्यानंतर आतापर्यंत पंकजा मुंडे यांच्या आणि प्रीतम मुंडे यांच्या उपस्थित हा दसरा मेळवा पार पडत होता. 2023 मध्ये अजित पवार यांनी 2023 मध्ये महायुतीत येण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे पुन्हा एकत्रित आल्याच चित्र पहायला मिळालं आहे. मात्र आज धनंजय मुंडे यांनी पहिल्यांदाच भगवान गडावर उपस्थिती लावली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना या मेळाव्यामध्ये काय बोलणार ते सांगितलं आहे.


भगवान गडाचं नाव कसं ठरलं?


यावेळी बोलताना ते म्हणाले, संतश्रेष्ठ भगवानबाबांच्या भगवान गडाचा वर्धापन दिन म्हणून दसऱ्याला मेळाव्याला सूरु झाली. नंतर स्वर्गीय गोपिनाथ मुंडे आणि पंकजा ताईंनी ती परंपरा सुरु ठेवली. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून विचाराचा सिमोल्लंघन करण्याचा प्रयत्न केला जातो. मी स्वतः भगवान बाबांचा भक्त आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर एक वेगळा आनंद आहे. भगवान गडाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हस्ते झाले होते. त्यावेळी नावं काय ठेवावं असं विचारलं तेव्हा स्वतः यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं तुमच्या नावातच भगवान आहे, त्यामुळे भगवान गड नावं ठेवलं.


मी या परंपरेपासून जवळपास एक तप दूर होतो, एका तपानंतर या ठिकाणी येताना एक अद्भुत आनंद मनात आहे. 12 वर्ष मी या सर्वापासून लांब होतो, त्यामुळे व्यासपीठावर काय बोलणार माहिती नाही. स्टेजवर गेल्यानंतरच जे मनात येईल ते बोलेन. जात-पात यापलीकडे सर्व या राज्यात महापुरुषांनी संतांनी काम केलं. सध्या जो सामाजिक सलोखा बिघडलेला आहे, दुरुस्त व्हावं अशी अपेक्षा आहे, असंही यावेळी धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. 


नारायण गडावरील मेळाव्याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, ज्यांनी दुसरा मेळावा सुरु केला त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. दसरा मेळाव्याची परंपरा ही राज्यात आतापासूनची नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बाळासाहेब ठाकरे, अलीकडे एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांचे मेळावे होतायत. आपल्याकडे दसरा मेळव्याला वेगळे महत्व आहे. जरं कोणी नव्याने या वर्षी दसरा मेळावा सुरु करत असेल तर त्याचे देखील स्वागत केले पाहिजे. त्याबद्दल मनात किंतु परंतू असण्याचे काही कारण नाही. सलोख्याचे सोने लुटले गेले पाहीजे, हीच अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.