अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी  (Baba Siddique Shot Dead) यांची काल रात्री तीन जणांनी गोळ्या घालून हत्या केली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. निवडणुकीच्या तोंडावर आणि विजयादशमीच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. या घटनेची आम्ही निंदा करतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे. ज्यांनी मारले त्यांनी जबाबदारी घेतली आहे. कशासाठी मारलं? का मारलं? नेमकी दुश्मनी काय होती? पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे.


प्रकाश आंबेडकरांची मागणी


मारेकऱ्यांनी कोणाची सुपारी घेतली. पोलिसांनी हे देखील शोधलं पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यातल्या संपत्तीवरून अथवा राज्यबाहेरील वाद होता का? असा सवाल देखील आंबेडकर यांनी उपस्थित केलाय. मारणारी गँग ही बाहेरील राज्यातील आहे. त्यांना प्रोत्साहन देणारा कोण? आणि सुपारी देणारा राजकीय व्यक्ती किंवा बिल्डर आहे का? हे तपासलं गेलं पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 


मुख्यमंत्री जबाबदारी स्वीकारावी : बाळासाहेब थोरात


काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलंय की, बाबा सिद्दिकींच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महत्त्वाच्या व्यक्तीची भर रस्त्यात हत्या झाली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत. सरकार सत्तेत कसे यायचे याच्यातच गुंग झालंय. राज्यात कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. गृहमंत्र्यांपेक्षा मुख्यमंत्री महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण सर्व गोष्टींवर असले पाहिजे. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एकाच महिन्यात अत्याचाराच्या तीन-चार घटना घडल्या. राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या होताय. मात्र, सरकार सत्तेच्या उद्योगात व्यस्त आहे. महाराष्ट्र अत्यंत वाईट परिस्थितीतून जातोय. राज्य शासनाचे नियंत्रण हरवले आहे. जीवे मारण्याच्या धमक्या आणि हत्या या काळजीच्या गोष्टी आहेत, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Devendra Fadnavis: बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर शरद पवारांची राजीनाम्याची मागणी; फडणवीस म्हणाले, 'त्यांना फक्त सत्ता...'


मोठी बातमी! बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पटली, पुण्याचा 'शिवा' नेमकं काय करतो?