औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली काँग्रेससोबतची युती तोडण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. शिवसेना-भाजपाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर बंगल्यावर शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांची आज बैठक पार पडली.


भाजपा कार्यकर्त्यांचा आग्रह होता की, शिवसेनेने जिल्हा परिषदमध्ये असलेले काँग्रेसची युती तोडावी. तेव्हाच आम्ही प्रचाराला सुरुवात करु. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या समन्वयाची एक बैठक महापौर बंगल्यावर बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर खासदार चंद्रकांत खैरे यांनी ही युती तोडल्याची घोषणा केली.


शिवसेनेने औरंगाबादमध्ये काँग्रेससोबत असलेली युती तोडली आहे. मात्र तशीच युती जालन्यात देखील आहे. त्यामुळे जालन्यातील काँग्रेससोबतची युतीही शिवसेना तोडणार का? याशिवाय भाजपाने देखील अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीसोबत युती केली आहे. ती देखील तोडणार का? हे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.


औरंगाबाद जिल्हा परिषद पक्षीय बलाबल
औरंगाबाद जिल्हा परिषदेतील सदस्यांची संख्या 62
शिवसेना - 18
भाजप - 23
काँग्रेस - 16
एनसीपी - 3
इतर - 2


सध्या जिल्हा परिषदेत शिवसेनेचा अध्यक्ष आहे, तर काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे. अडीच वर्षानंतरच्या निवडणुकीला तीन महिने राहिले आहेत. या तीन महिन्यानंतरच्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष असेल अशी घोषणा चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.