Aurangabad Water Issues: औरंगाबाद शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरु आहे. त्यातच आता हिमायत बागेतील ऐतिहासिक शक्कर बावडीच्या पाण्यातून दिल्ली गेट, रोजाबाग आणि परिसरातील नागरिकांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी प्रभारी मनपा प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. या बावडीतून लवकरच पिण्यायोग्य पाणी नागरिकांना देण्यासाठी मनपा प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. 


शक्कर बावडीतून काढण्यात येत असलेल्या गाळाची, दुरूस्तीची पाहणी आज जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. यावेळी महानगरपालिकेचे शहर अभियंता सखाराम पानझडे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, हिमायत बागेचे प्रशासकीय अधिकारी एम.बी.पाटील, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता डी.के. पंडित, उप अभियंता डी.पी. गायकवाड, कृषी अधिकारी अविनाश देवळे आदींची उपस्थिती होती.  


जिल्हाधिकारी म्हणाले...


यावेळी जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, शक्कर बावडीतून गाळ उपसण्याचे काम सुरू आहे. आता पर्यंत 20 बाय 80 मीटरच्या या बावडीतून अंदाजे 150 ब्रास गाळ उपसण्यात आला आहे. गाळ उपसण्यासाठी आवश्यक ती सर्व यंत्रसामुग्री यंत्रणेला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आगामी चार दिवसात संपूर्ण गाळ उपसून बावडीचे पाणी रोझाबाग सेटलिंग टँकमध्ये पोहोचवल्या जाईल. त्याठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण, गुणवत्ता तपासून नागरिकांना लवकरच या बावडीतून पाणी देण्यात येणार आहे, असं चव्हाण यांनी पाहणीदरम्यान सांगितले.


दुष्काळातही पाणी...


पूर्वी हिमायत बागेला नहरीचे पाणी वापरले जायचे. ते पुरेसे नसल्याने तत्काळात विहिर खोदण्यात आली. तिचे पाणी गोड असल्याने शक्कर बावडी नाव पडले. पूर्वी या विहिरीचे पाणी मोटेने बागेला दिले जात असत. 1972 च्या दुष्काळातही विहिरीने परिसरातील अनेक वसाहतींची तहान भागवल्याचे जुने जाणकार सांगतात.


आयुक्त सुट्टीवर...


मनपा आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडे सुट्टीवर आहेत. त्यामुळे सद्या महानगरपालिकेचा प्रभारी चार्ज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे आहे. तर मनपाचा चार्ज घेताच चव्हाण यांनी शहरातील पाणी प्रश्नाच्या मुद्यावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील मुख्य जलवाहिनीवरून पाणी घेणाऱ्या बड्या ग्राहकांच्या नळांना मीटर बसवण्याचा निर्णय चव्हाण यांनी घेतला आहे. तसेच जायकवाडी धरणातून शहरात येणाऱ्या महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून पाणी घेणाऱ्या गावांच्या जलवाहिनीला मीटर बसवण्यात येणार असल्याचा निर्णय चव्हाण यांनी घेतला आहे.