Aurangabad Bench Judgment: अनेकदा पोलिसांकडून खोटे गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप होतो. मात्र पुढे न्यायालयात प्रकरण टिकत नाही. आता असाच काही प्रकार बीड जिल्ह्यात समोर आला आहे. दरम्यान एका प्रकरणात निकाल देताना औरंगाबाद खंडपीठाने दखलपात्र गुन्ह्यासह फौजदारी खटला रद्द करत भादंवि कलम 324 नुसार कोल्हापुरी चप्पलला 'जीवघेणे हत्यार' (डेन्जरस वेपन) म्हणता येणार नाही, असे निरीक्षण नोंदवला आहे. औरंगाबाद खंडपीठाच्या (Aurangabad Bench) न्या. अनुजा प्रभुदेसाई आणि न्या. आर. एम. जोशी यांनी यांनी याबाबत निकाल दिला आहे. 


कोल्हापुरी चपलेने मारहाण केल्याच्या सख्ख्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम 324 अन्वये नोंदविलेला 'दखलपात्र गुन्हा' तसेच कथित घटना घराच्या पायरीवर घडल्यामुळे पोलिसांनी दाखल केलेला भादंवि कलम 452 नुसारचा घुसखोरीचा दखलपात्र गुन्हा रद्द केला. त्याचप्रमाणे वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने केजच्या प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयातील प्रलंबित फौजदारी खटला सुद्धा रद्द केला आहे. 


काय आहे प्रकरण? 


बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोग येथील मंगेश मंचकराव देशमुख आणि त्यांची पत्नी श्रद्धा यांनी मंगेशचा सख्खा भाऊ अनंत देशमुख यांना घरात घुसून कोल्हापुरी चपलेने मारहाण केल्याची तक्रार दिली होती. त्यावरून केजच्या पोलिसांनी वरील पती-पत्नी विरुद्ध भादंवि कलम 452,324,323,504 अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. न्यायालयात फौजदारी खटला दाखल झाला होता.त्यामुळे सदर गुन्हा आणि खटला रद्द व्हावा, यासाठी मंगेश आणि त्यांच्या पत्नीने अॅड. हनुमंत जाधव यांच्यामार्फत खंडपीठात धाव घेतली होती. ज्यात निकाल देताना कोल्हापुरी चप्पल जिवघेणे हत्यार होऊ शकत नाही असे म्हणत न्यायालयाने दखलपात्र गुन्ह्यासह फौजदारी खटला रद्द केला आहे.