Aurangabad Renaming: गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादच्या नामांतराचा (Aurangabad Renaming) मुद्दा प्रलंबित असून, यावरून अनेकदा राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले आहेत. मात्र आता पुन्हा एकदा औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण औरंगाबादच्या (Aurangabad) कन्नड तालुक्यातील माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी नामांतराच्या मुद्द्यावरून शहरात लावलेल्या एका बॅनरची जोरदार चर्चा आहे. 'छत्रपती संभाजीनगरच (Chhatrapati Sambhaji Nagar) काय झालं?', असे म्हणत जाधव यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर नामांतराच्या मुद्द्यावरून निशाणा साधला आहे. 


औरंगाबाद जिल्ह्याचा नामांतराचा मुद्दा गेली अनेक वर्षे चर्चेचा मुद्दा बनला आहे. दरम्यान यावरून अनेकदा राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात येतात. दरम्यान आता याच मुद्यावरून हर्षवर्धन जाधव यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर निशाणा साधला आहे. जाधव यांनी जालना रोडवरील औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या आपल्या कार्यालयाबाहेर एक बॅनर लावले आहेत. ज्यात त्यांनी 'छत्रपती संभाजीनगरचं काय झालं?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. 


बॅनर काय लिहिले आहे? 


जाधव यांनी लावलेल्या बॅनरच्या सुरवातील वरच्या बाजूला 'फसव्या हिंदुत्ववाद्यांचा जाहीर निषेध' असा उल्लेख केला आहे. त्याखाली 'छत्रपती संभाजीनगरच काय झालं?' असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यानंतर महाविकास आघाडीमधील ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांचा उल्लेख करून 'आम्ही संभाजीनगर केले असा उल्लेख आहे. त्याच्याच बाजूला शिंदे गट आणि भाजप यांचा उल्लेख करत 'आम्ही छत्रपती संभाजीनगर केले' असा उल्लेख आहे. शेवटी औरंगाबाद जिल्हाधिकारी यांचा उल्लेख करत; अशा प्रकारचे कुठले ही निर्णय झाल्याची माहिती आम्हाला नाही' असा उल्लेख करण्यात आला आहे. 


जाधवांची टीका.. 


दरम्यान याचवेळी हर्षवर्धन जाधव यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षावर नामांतराच्या मुद्यावरून टीका केली आहे. फसव्या हिंदुत्ववाद्यांनी हिंदूंची मते घेऊन 30 वर्षे हिंदूनाच फसविले असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. तर खोटं बोलणाऱ्या सर्व राजकीय पक्षांचा धिक्कार असो, अशी टीकाही यावेळी जाधव यांनी केली आहे. 


राजकीय वातावरण तापणार! 


गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या नामांतरावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात श्रेयवाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अशात आता जाधव यांनी पुन्हा एकदा औरंगाबादच्या  नामांतराचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे त्यांच्या याच टीकेला आता शिंदे आणि ठाकरे गटाकडून काय उत्तर दिले जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे जाधव यांनी शहरातील मोक्याच्या ठिकाणी हे बॅनर लावल्याने त्याची शहरात जोरदार चर्चा होत आहे.