Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहर राजकीय नेत्यांच्या सभा आणि मोर्च्यांमुळे सतत चर्चेत आहे. त्यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 8 तारखेच्या सभेनंतर आमची सुद्धा सभा होणार असल्याचा इशारा एमआयएमचे नेते तथा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. तसेच आमची सभा 'सौ सुनार की एक लोहार की' अशी असणार असल्याचा टोलाही जलील यांनी विरोधकांना लगावला आहे.


आधी मनसे प्रमुख राज ठाकरेंची जाहीर सभा, त्यांनतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा 'जल आक्रोश मोर्चा' आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जाहीर सभा औरंगाबादमध्ये होत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहर राजकीय आखाडा बनला आहे. त्यातच आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांची सुद्धा जाहीर सभा होणार असल्याची माहिती जलील यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुका पाहता औरंगाबाद शहर राज्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.


काय म्हणाले जलील...


माध्यमांशी बोलताना जलील म्हणाले की, मी म्हणालो होतो सगळ्यांचं होऊ द्यात मग आमचं 'सौ सुनार की एक लोहार की रेहेंगी', त्याचं होऊ द्या त्यांनतर आमची शंभर टक्के सभा होणार आहे. मात्र आम्हाला कुठे गावात फिरून लोकांसाठी गाड्यांची सोय करून द्यावी लागणार नाही. कुठेही पैसे देण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे सगळ्यांच्या सभा होऊ द्या त्यांनतर शेवटी आमची सभा होईल असं जलील म्हणाले.


'तो' निर्णय ओवैसी घेतील...


तर राज्यसभेच्या साहव्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीबाबत विचारले असता जलील म्हणाले, याबाबत निर्णय पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे घेतील. 6 जूनला ओवैसी नांदेडमध्ये असणार त्या ठिकाणी किंवा 7 जूनला त्यांची लातूर येथे सभा होणार असून, त्यानंतर आम्ही बैठक घेऊन निर्णय घेऊ असे जलील म्हणाले. निवडणूक लढवत असलेले सर्व लोकं संपर्कात असून, विनंती करत आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार पक्षातील कुणा आमदार किंवा खासदारांना नसून ते निर्णय फक्त असदुद्दीन ओवैसी यांना असल्याचे सुद्धा जलील म्हणाले.