औरंगाबाद : जनावरांच्या लम्पी आजारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. एनडीआरएफच्या निकषानुसार लम्पी आजारावर मदत करण्यात येणार आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  औरंगबादमधील पैठण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी लम्पी आजारावर एनडीआरफच्या निकषानुसार मदत करण्यात येईल अशी माहिती दिली. 


जनावरांच्या लम्पी आजारावर मदत करण्यासाठी एनडीआरएफचे निकष लावण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये झालाय, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. "शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील निर्णय घेतला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, त्यांना मदत करण्याचा जीआर काढण्यात आलाय. गोगलगाईपासून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत निर्णय घेतयाल. तीन हेक्टर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मदत दिली जाईल याचा देखील आज निर्णय घेण्यात आलाय. एनडीआरएफपेक्षा शेतकऱ्यांना दुप्पट मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधी शेतकऱ्यांना पाच हजार रूपये मिळत होते, आता 15 हजार रूपये मिळणार आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजेत यासाठी हे सरकार काम करेल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना दिले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. "बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कोणती याचं उत्तर आजच्या या विराट सभेनं दिलं आहे. आजच्या सभेला सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मला शिवकवण दिलीय की जे होणार आहे तेच बोलायचं. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो. एकदा शब्द दिला की मी स्वतःचही ऐकत नाही. लोक विरोधातून सत्तेकडे जातात. परंतु, आम्ही सत्तेकडून विरोधात गेलो.  त्यावेळी अनेकजण आमचा कार्यक्रम करण्याच्या तयारीत होते. परंतु, 50 जण सोबत असलेले सगळे विश्वासू होते. त्यामुळे आम्ही यशस्वी झालो. आमचा निर्णय हा जगातील एक मोठा इतिहास आहे. अडीच वर्षांचा वनवास भोगला. परंतु, आता सगळे आमदार हा वनवास संपला असे म्हणत आहेत. अडीच वर्षे समाजात नकारात्मकता पसली होती. परंतु, देवेंद्र फडणवीस आणि मी ठरवून निर्णय घेतला आणि जनतेच्या मानातील सरकार स्थापन केलं. आज जनतेमध्ये उत्साह आहे, असे एनाथ शिंदे म्हणाले.  


अजित पवारांना टोला


यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देखील टोला लगावला. अजित पवार हे सकाळी सहापासून लोकांची कामे करतात असे सांगितले जाते. परंतु, मी सकाळी सहापर्यंत लोकांची कामे करतो असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना टोला लगावला.