औरंगाबाद : फी माफीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मागील चार दिवसापासून विद्यार्थी उपषोणाला बसले असून विद्यापीठ प्रशासनाने मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे.


महाराष्ट्र शासनाने सन 2014-2015 आणि 15-16 साली दुष्काळामुळे विद्यार्थ्यांची परिक्षा फी माफ करण्याचा निर्णय घेतला होता. भरलेल्या फीचे पैसे विद्यार्थ्यांना परत देण्याचे आदेश काढण्यात आला होता. बाबासाहेब आंबेडकर विद्यपीठांतर्गत मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद हे चार जिल्हे येतात. या चारही जिल्ह्यातील गावाची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे.

ज्या गावातील पैशांची आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. त्या गावातील विद्यार्थ्यांची फी माफीचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी दोन वर्षाचे मिळून जवळपास आठ कोटींचा निधी देण्यात आला होता. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले नाही.

याच मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत. मात्र विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांची फी परत केली नाही, शिवाय गेल्या चार दिवसांपासून या विद्यार्थ्यांची साधी विचारपूसही केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त केला आहे.