अमरावती : आमचे पक्ष जरी लहान असले तरी आमचे अस्तित्व आहे, असे म्हणत माजी मंत्री तथा आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu ) यांनी महायुतीतील पक्षाला देखील खडेबोल सुनावले आहेत. 'महायुतीच्या बैठकीचा निरोप आज सकाळी वेळेवर आला. त्यामुळे मला जाणे जमले नाही, शिवाय मला बैठकीचे काय विषय आहेत, हे देखील माहीत नसतात. ते डायरेक्ट बैठकीला बोलावतात. सगळे आपल्यासोबत आहेत, हे गृहित धरून सध्या भाजपचे (BJP)  काम सुरू आहे. भाजपने इतर घटक पक्षांवर लक्ष ठेवले पाहिजे', अशी नाराजी माजी मंत्री तथा आमदार  बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी उघडपणे बोलून दाखवली आहे. 


पक्ष मोठा झाला म्हणजे लहान पक्षांना विसरू नये


भाजपची भूमिका नेहमीच काम काढून घेण्याची राहिली आहे. पक्ष मोठा झाला म्हणजे लहान पक्षांना विसरू नये. प्रत्येकाने युतीधर्म पाळायला हवा. आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितलं पण ते जर उलटं घेत असतील तर, तो त्यांचा प्रश्न. आमचा पक्ष महाराष्ट्रात आहे. तरी जिल्हा नियोजन समिती असेल किंवा निराधार योजना असेल, या संदर्भात कुठली विचारणा होत नाही. याबाबत सगळेजण नाराज आहेत. पक्ष मोठा झाला म्हणजे लहान पक्षांना विसरू नये. कारण त्यांच्या शिवाय तुमचे काम पूर्ण होणार नाही. येत्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा देणार हे भाजपने स्पष्ट केले पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले आहेत.


...तर देशात इतर पक्षांची कमतरता नाही


'राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली असल्यास त्यांचे आम्ही स्वागत करू.  मुख्यमंत्र्यांमुळेच भाजपचं महाराष्ट्रात थोडं काही जमेल. मात्र या दौऱ्याला सुरुवात करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी घटक पक्षांची चर्चा करावी आणि मग महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करायला हवी.' अशी मागणी करतानाच राजकुमार पटेल आणि आम्ही वेगळे निर्णय घेणार नसून सोबत निर्णय घेऊ, असंही आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केलं आहे. 'मी मुख्यमंत्री किंवा इतर कुणाशीही जागा वाटपाबाबत बोलणार नाही. हे सोबतच्या दोन्ही पक्षाने ठरवावं की, लहान पक्षांना कशा पद्धतीने सोबत न्यावं. त्यांनी जर सोबत घेतलं नाही तर, देशात इतर पक्षांची कमतरता नाही', असे देखील कडू म्हणाले. 


'भाजपची भूमिका नेहमीच काम काढून घेण्याची'


'भाजपची भूमिका नेहमीच काम काढून घेण्याची राहिली आहे. जागावाटप बाबत कुठल्याही प्रकारची चर्चा न करता पुढे जाण्याची त्यांची भूमिका असते, पण असे चुकीचे ठरेल. आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितलं पण ते जर उलटं घेत असतील, तर तो त्यांचा प्रश्न. विधानसभेच्या आम्ही 15 जागा मागू. तर लोकसभेत देखील आम्हाला आमदारांच्या तुलनेत जागा मिळाली पाहिजे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात आपला दम दाखवू', असा विश्वास देखील बच्चू कडू यांनी बोलताना व्यक्त केला. 


महत्वाच्या इतर बातम्या :