Farmers News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना (Maharashtra Farmers) सातत्यानं विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिक संकटामुळं (Natural Disaster) वाढती नापिकी आणि कर्जबाजारीपणा यामुळं अनेक ठिकाणी शेतकरी टोकाचं पाऊल उचलत आहेत. जानेवारी 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत अमरावती विभागात तब्बल 951 शेतकऱ्यांनी आत्महत्या (farmers suicide) केल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी अमरावती जिल्ह्यात 268, यवतमाळ जिल्ह्यात 246, बुलढाणा जिल्ह्यात 237 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. 


छत्रपती संभाजीनगरमध्ये मार्च 2023 ते ऑक्टोबर 2023 या 8 महिन्याच्या कालावधीत 741 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. 289 अंतर्गत नागपूरजवळच्या सोलार इंड्रस्टीत झालेल्या स्फोट प्रकरणावर विधान परिषदेत चर्चा सुरु आहे. या चर्चेत मंत्री अनिल पाटील यांनी शेतकरी आत्महत्या प्रकरणी ससविस्तर माहिती दिली आहे. 


कोणत्या विभागात किती आत्महत्या?


अमरावती विभागात - 951
छत्रपती संभाजीनगर मराठवाडा विभागात - 877
नाशिक विभागात - 254
नागपूर विभागात - 257
पुणे विभागात - 27
लातूर जिल्हा - 64
धुळे जिल्हा - 28


अशा एकूण 2478 शेतकरी आत्महत्येची प्रकरण राज्यभरातून समोर आली आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर महिन्या दरम्यान समोर आल्याची माहिती लेखी उत्तरात राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.


शेतकरी आत्महत्येनंतर विविध प्रश्न समोर


राज्यात विविध कारणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाल्याबाबत विविध प्रश्न समोर येत आहेत. राज्यात सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेत मालाला भाव नसणे इत्यादी अनेक कारणास्तव मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.  शेतकरी आत्महत्याग्रस्त भागाकडे शासनाने विशेष लक्ष देवून आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरणाऱ्या अनेक समस्यांचे निराकरण करुन या आत्महत्या रोखण्यासंदर्भात शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे? असा सवालही करण्यात येत आहे. या प्रकरणी शासनाचे चौकशी करून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांचे पुनर्वसन तसेच त्यांना आर्थिक मदतीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे. नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ? असे सवाल उपस्थित केले जात आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


धक्कादायक! महाराष्ट्रात 10 महिन्यात तब्बल 2478 शेतकऱ्यांनी संपवली जीवनयात्रा, राज्य सरकारची कबुली