Maha Pasudhan Expo : राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून नुकसानग्रस्तांना लवकरच मदत दिली जाणार असल्याचं वक्तव्य कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी केलं. शिर्डीत तीन दिवस महापशुधन एक्सपोचे (Mahapasudhan Expo) आयोजन करण्यात आलं आहे. या एक्सपोचं उद्घाटन कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणी पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. माझ्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) आणि राधाकृष्ण विखे पाटलांचा मोठा वाटा असल्याचे सत्तार म्हणाले.


देशपातळीवरील सर्वात मोठ्या महापशुधन एक्स्पोचं आयोजन शिर्डीत करण्यात आलं आहे. शेतीला पूरक व्यवसाय असणाऱ्या पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन तसेच इतर सर्व पशुपक्षांचा महाएक्स्पो शिर्डीत सुरु झाला आहे. 46 एकर जागेवर हे एक्स्पो होत आहे. या ठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन चर्चासत्र आणी सांस्कृतिक कार्यक्रम याठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत.


संगमनेरच्या घोड्याची लगाम विखे पाटलांच्या हातात


महापशुधन एक्स्पो मध्ये 300 स्टॉल लावण्यात आले आलेत. तसेच या प्रदर्शनात विविध प्रकारच्या गायी आणि घोडेही आहेत. यामध्ये संगमनेरी घोडेही आहेत हे मला पहिल्यांदाच माहित पडल्याचे सत्तार म्हणाले. घोडा कुठलाही असो पण लगाम विखे पाटलांकडे असतो. संगमनेरच्या घोड्याचीही लगाम विखे पाटलांच्या हातात असल्याचा टोला सत्तार यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटलांना लगावला. ज्यांना लगाम धरता येते त्यांनीच घोडा खरेदी करावा. आपल्याला लगाम धरता येतच नाही. ती लगाम धरण्याचं काम विखे पाटील चांगल्या पद्धतीने करतात असेही सत्तार म्हणाले.


माझ्या जडण घडणीत अशोक चव्हाण आणि विखे पटलांचा मोठा वाटा 


दरम्यान, सुजय विखे पाटलांनी एक्स्पोचे केलेले नियोजन उल्लेखनीय असल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले. मी कृषी प्रदर्शन घेतलं, किती त्रास होतो मला माहित आहे असे सत्तार म्हणाले. गलतीया सबकी होती है दोस्त, किसकी छप जाती है किसीकी छुपायी जाती है. मी आज या ठिकाणी पोहोचलोय यात अशोक चव्हाण आणि विखे पटलांचा मोठा वाटा असल्याचे सत्तार म्हणाले. 


 माझा मेन करार विखे पाटलांसोबतच 


मागच्या सरकारमध्ये माझ्यावर मोठं धर्मसंकट होतं. मी महसूल राज्यमंत्री होतो आणि ते होते कॅबिनेट मंत्री ( बाळासाहेब थोरात ). माझे नेते राधाकृष्ण विखे पाटील. यावेळी विखे पाटलांचे प्रेम कमी करा असा मला फोन यायचा. हा विषय उद्धव ठाकरेंपर्यंत देखील गेला होता असे सत्तार म्हणाले. मात्र विखे पाटलांनी आणि मी आमच्या दोस्तीत कधी फॉल्ट येऊ दिला नाही असेही ते म्हणाले. आता ओरिजनल शिवसेना-भाजपची युती सत्तेवर आली आहे. आम्ही पुण्याचं काम केलं पण लोक चुकीचा अर्थ लावतात. त्यावेळी झालेली चूक दुरुस्त करण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलं आहे. मी काही पर्मनंट शिवसैनिक नाही. जसा प्रासंगिक करार होतो तसा मी आपला मेन करार विखे पाटलांसोबतच असल्याचे सत्तार म्हणाले.


अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातले शेतकरी सधन आहेत. त्यामानाने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नसल्याचे सत्तार म्हणाले. आमच्या सरकारनं शेतकरी सन्मान निधी योजना आणली. केंद्राचे सहा आणि राज्याचे सहा असे 12 हजार रुपये देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केल्याचे सत्तार म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या:


Abdul Sattar: पीकविम्याचे पैसे 31 मे पर्यंत देणार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे विधानपरिषदेत आश्वासन