अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीच्या दौऱ्यावर असताना अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका करताना 2014 पूर्वी देशात कशाप्रकारे भ्रष्टाचाराचे लोन पसरले होते, यावर भाष्य केलं. त्याचबरोबर 2014 नंतर शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना कशा अमलात आल्या हे देखील स्पष्ट केले. त्याचबरोबर इतरही विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं, यांपैकी महत्वाचे दहा मुद्दे आपण पाहुयात.


भाषणाची मराठीतुन सुरवात!


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरवात मराठीतून करत शिर्डीच्या या पावन भूमीला माझे कोटी कोटी नमन' म्हणत भाषणाला सुरवात केली. मोदी यावेळी म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी या पवित्र मंदिराला शंभर वर्ष पूर्ण झाली होती, त्यावेळी मला दर्शनाची संधी मिळाली होती. साईबाबांच्या आशीर्वादाने आज साडे सात हजार कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. 


बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली 


यावेळी सुरवातीलाच त्यांनी कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांना आदरांजली देखील वाहिली. ते म्हणाले की, आज सकाळी देशाचं अनमोल रत्न, वारकरी संप्रदायाचं वैभव बाबामहाराज सातारकर यांचं निधन झालं. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ज्यांनी जगाला मार्गदर्शन केलं, त्यांच्या सहज वाणीतुन निघणाऱ्या 'जय जय रामकृष्ण हरि'ने एक वेगळाच आनंद मिळत होता. मात्र आज त्यांचे देहावसान झाले, त्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली!'


आमचे सरकार 'सबका साथ सबका विकास'च्या मंत्रावर चालते.  


पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, आमचे सरकार 'सबका साथ सबका विकास'च्या मंत्रावर चालते. गरिबांचे कल्याण करण्यासाठी आमचे सरकार काम करत आहे. आतापर्यंत 1 कोटी 10 लाख नागरिकांनी आयुष्यमान कार्ड अंतर्गत मोफत उपचाराचा लाभ घेतला आहे. गरिबांना मोफत रेशन आणि घर देण्यासाठी 4 लाख कोटी रुपयांचा खर्च केला आहे. पीएम विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून सुतार आणि इतर व्यावसायिकांना मदत करण्यात आली.


देशाच्या कल्याणासाठी अनेक योजना 


मोदी पुढे म्हणाले की, देशाच्या कल्याणासाठी आम्ही काम करत असून मागील दहा वर्षांत देशातील नागरिकांना निराश केले नाही. देशातील गरीब परिवारांना पुढे जाण्याचा योग येवो हे आमचे ध्येय आहे. गरीब कल्याणासाठी सरकारचा बजेटही वाढत आहे. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत गरीबांना मोफत उपचारांसाठी 70 हजार कोटी खर्च केले असून गरीबांच्या घरांसाठीही सरकारने 40 लाख कोटी रूपये खर्च केले. हर घर जल पोहोचवण्यासाठीही आतापर्यंत 2 लाख करोड रूपये खर्च करण्यात आले आहेत. 


2014 आधीही मोठे आकडे ऐकत होतात, मात्र ते भ्रष्टाचाराचे आकडे होते


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार त्यांच्यासमोरच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या टीकास्त्र सोडले. २०१४च्या आधी केंद्र सरकारमध्ये महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते कृषिमंत्री पदावर होते, मात्र त्यावेळी शेतकऱ्यांना मोठ्या हाल अपेष्ठा सहन कराव्या लागल्या. आपल्या सरकारच्या माध्यमातून कोटी रुपयांच्या योजना शेतकऱ्यांसाठी कार्यान्वित करण्यात आल्या. मी लाखो कोट्यवधी रुपयांचे आकडे सांगत आहे. हेच आकडे आपण काही वर्षांपूर्वी ऐकले असतील पण ते भ्रष्टाचाराचे होते. आधीच्या सरकारने एवढ्या रक्कमांचे घोटाळे केले. त्यांनी फक्त घोटाळे केले आहे. पण आम्ही विकास करतोय, असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले


शेतकऱ्यांच्या नावावर मतं मागून थेंब थेंब पाण्यासाठी तरसवलं! 


आपल्याला शेतकऱ्यांच्या नावावर मतं मागून थेंब थेंब पाण्यासाठी तरसवले आहे. महाराष्ट्राला 5 दशकांपासून ज्या निळवंडे धरणाचे वेध होते, ते काम आज पूर्ण झालं. ज्या कामांचं भूमिपूजन मी केलं, त्याच उद्घाटन करण्याचा योगही मलाच आला. आज जेव्हा या डॅममधून पाणी सुरू झाले, हा परमात्म्याचा प्रसाद आहे. आता एक थेंबही वाया घालवू नका. आम्ही चांगल्या नियतीने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहोत. 


शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?


यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर अजित पवार त्यांच्यासमोरच टीका केल्याचे दिसून आले. मोदी म्हणाले की, 'महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री कृषी मंत्री म्हणून काम करत होते व्यक्तिगतरीत्या मी त्यांचा सन्मान करतो मात्र सात वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपी वर धान्य खरेदी केले परंतु आपल्या सरकारने सात वर्षात साडेतीन लाख कोटी रुपया ंच्या एमएसपीवर धान्य खरेदी केल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. 


शेतकऱ्यांचे नाव फक्त राजकारणासाठी वापरले गेलं!


शरद पवार यांच्यावर टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 2014 च्या आधी महाराष्ट्रातील एक नेते अनेक वेळा राज्याचे कृषिमंत्री राहून गेले. मात्र त्या काळात शेतकऱ्यांचे मोठे हाल होते. शेतकऱ्यांसाठी कुठलीच योजना काम करत नव्हती. शेतकऱ्यांना अनेकदा हेलपाटी मारावे लागत होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे नाव फक्त राजकारणासाठी वापरले गेलं मात्र 2014 नंतर हे चित्र बदललं. आपल्या सरकारने शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम केलं, अस नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. 


2014 नंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना अच्छे दिन 


2014 नंतर आपले सरकार देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आणत असून पीएम किसान सन्मान निधीच्या मध्यमातून  देशातील करोडो शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली. शेतकऱ्यांना आत एकूण 12000 रूपये मिळतील. आम्ही चांगल्या नियतीने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहोत. 


इतर महत्वाची बातमी : 


PM Modi Ajit Pawar : अजित पवारांसमोर पंतप्रधान मोदींनी मागच्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला