अहिल्यानगर : जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने आणि तीव्र वादळी वाऱ्याने प्रचंड थैमान घातले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बसला असून, शेतातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या सोलर पंपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळाच्या तीव्रतेमुळे कोट्यवधी रुपयांचे सोलर पॅनेल्स तुटून आणि उन्मळून पडल्याने बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे.
1 जून रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळाचा जोर इतका तीव्र होता की, शेवगाव तालुक्यातील आव्हाने खुर्द, आव्हाने बुद्रुक, शहापूर, आणि बर्हाणपूर परिसराला याचा सर्वाधिक फटका बसला. या परिसरातील शेतांमध्ये बसवण्यात आलेले सोलर पॅनेल्स वाऱ्याच्या प्रचंड वेगाने थेट हवेत उडून गेले, तर अनेक ठिकाणी ते जमिनीवर कोसळून फुटले आहेत.
लाखो रुपयांचे नुकसान; शेतकरी भयंकर चिंतेत
पारंपरिक विजेला पर्याय म्हणून आणि दिवसा सिंचन करता यावे यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून तसेच स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून शेतकऱ्यांनी शेतात सोलर पंप बसवले होते. मात्र, या एकाच वादळाने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडून टाकले आहे.
अनेक शेतकऱ्यांचे सोलर पॅनेल्स पूर्णपणे फुटले असून ते आता वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत. लोखंडी अँगल आणि खांबांसह संपूर्ण सोलर यंत्रणा अनेक ठिकाणी मुळासकट उखडून पडली आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आणि पेरणीच्या पूर्वतयारीच्या वेळीच सोलर पंप निकामी झाल्यामुळे आता पिकांना पाणी कसे द्यायचे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
पंचनामे करून तातडीने भरपाई देण्याची मागणी
या अस्मानी संकटामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेवगावमधील शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. महावितरण आणि प्रशासकीय यंत्रणेकडून आता तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महसूल विभाग आणि कृषी विभागाने तातडीने या वादळग्रस्त भागात संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत किंवा विमा नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी आर्त हाक शहापूर, आव्हाने आणि बह्रानपूर परिसरातील शेतकऱ्यांकडून प्रशासनाला दिली जात आहे.
ही बातमी वाचा:
