Ahilyanagar News : कुटुंबियांसोबत शेतात खत टाकण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा ओढ्याच्या पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे घडली आहे. या घटनेने गोगलगाव परिसरात शोककळा पसरली आहे. साहिल दत्तात्रय चौधरी (19) आणि किरण नारायण चौधरी (14) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, गोगलगाव येथे वस्तीवर राहणारे दत्तात्रय व नारायण चौधरी हे दोघे भाऊ शेती व्यवसाय करतात. दत्तात्रय हे खासगी वायरमन म्हणूनही काम करतात. बुधवारी दुपारी शेतात खत टाकण्यासाठी साहिल दत्तात्रय चौधरी (19) व किरण नारायण चौधरी (14) हे चुलतभाऊ कुटुंबियांसोबत गेले होते. खत टाकण्याचे काम पूर्ण झाल्यावर साहिल व किरण हे हात-पाय धुण्यासाठी जवळच्या ओढ्यावर गेले.
पाय घसरून ओढ्याच्या पाण्यात बुडाले
सध्या निळवंडे धरणातून तळे भरण्यासाठी पाणी सोडण्यात आलेले आहे. डाक तलावात पाणी सोडण्यासाठी ओढ्याचे खोलीकरण करण्यात आलेले आहे. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही मुलांचा पाय घसरून ते ओढ्याच्या पाण्यात बुडाले. दोघांनाही पोहता येत नव्हते. त्यांच्या कुटुंबियांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून दोघांना बाहेर काढले. त्यांना तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
गोगलगाव परिसरात शोककळा
दरम्यान, किरण हा नुकताच आठवी इयत्ता उत्तीर्ण झाला होता तर साहिल लोणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकत होता. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. चौधरी कुटुंबाला धीर देण्यासाठी अनेक नातेवाईक पोहचले. प्रवरा रुग्णालयात दोघांचे शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी गोगलगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने गोगलगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
अल्पवयीन मुलावर टोळक्याचा हल्ला
दरम्यान, वाहनाला कट मारल्याच्या कारणातून अहिल्यानगरच्या शहा कॉर्नर, आलमगीर भागात एका अल्पवयीन मुलावर (16) टोळक्याने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या जबाबावरून मंगळवारी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात 13 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी आलमगीर भागातील मातोश्री उर्दू शाळेजवळून त्याच्या आईसोबत मोपेडवरून घरी जात असताना वसीम मेहबूब सय्यद आणि समिर सय्यद हे दुचाकीवरून समोरून आले. त्यांनी वाहनाला कट का मारला, या कारणावरून वाद घातला. यानंतर संशयित आरोपींनी शिवीगाळ, दमदाटी केली व चापटीने मारहाण केली. त्यानंतर इतर 11 संशयित आरोपींना पाचारण करून, सर्वांनी संगनमत करून लोखंडी रॉड, लाकडी दांडके व कोयत्याने फिर्यादी व त्यांच्या आईवर हल्ला केला. यामध्ये फिर्यादीला दुखापत झाली असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वसीम सय्यद, समिर सय्यद, असरार सय्यद, अबरार सय्यद, मुनाफ सय्यद, हन्नान सय्यद, हस्नान सय्यद, फिरोज सलीम खान, असिफ खान, ईर्शाद शेख, ईम्रान सय्यद, सुफियान सय्यद, हनिफ सय्यद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा