Nilesh Lanke : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात उमेदवार उभे करून थेट लढत दिली. मात्र निवडणुकांनंतर दोन्ही गटांतील नेत्यांमध्ये अनौपचारिक गाठीभेटी वाढू लागल्या. काही सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार एकाच व्यासपीठावरही एकत्र दिसले. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारली नाही. त्यांनी म्हटले की, "दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र आले, तर त्यात काहीच आश्चर्य नाही. मात्र अंतिम निर्णय सुप्रिया सुळे यांचाच असेल," असे त्यांनी म्हटले. त्यानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या. आता या चर्चांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. "पवार इज द पॉवर" असं मी नेहमी म्हणतो, त्यामुळे पवार परिवार अखंडित राहावा हीच आमची भावना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

पवार कुटुंब एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चाबाबत मला कल्पना नाही. मात्र, पक्षाचे नेतृत्व करणारे नेतेमंडळी जो निर्णय घेतील, तो मान्य करायचा असतो, अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली आहे. तर खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयात आजही अजित पवारांचा फोटो आहे. याबाबत देखील निलेश लंके यांनी भाष्य केले आहे. 

...म्हणून माझ्या कार्यालयात अजित पवारांचा फोटो 

निलेश लंके म्हणाले की, पवार परिवार आमचे नेतृत्व करणारा परिवार आहे. त्यामुळे शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो माझ्या कार्यालयात आहेत. जरी आम्ही वेगळ्या गटात असलो तरी कुठेतरी एक स्नेह, जिव्हाळा आणि आपुलकीचे नाते असते, म्हणून अजित पवारांचा फोटो माझ्या कार्यालयात आहे. "पवार इज द पॉवर" असं मी नेहमी म्हणतो. त्यामुळे पवार परिवार अखंडित राहावा हीच आमची भावना असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ज्या लोकांना भविष्य दिसत नाही ते इकडे तिकडे जातील; राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशावेळी नेमकं काय म्हणाले जयंत पाटील

पवारसाहेब नेता बनवणारी फॅक्टरी, त्यांनी सांगितलं तर हिमालयावरुनही उडी मारेल, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?