अकोला : कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाल्यानंतर कृषी विभागाला खडबडून जाग आली आहे. अवैध कीटकनाशकांच्या साठ्याविरोधात सुरु केलेल्या कारवाईत कृषी विभागाने अकोल्यात दोन दिवसात 14 कोटी 31 लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे.


अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाकडून कीटकनाशकांच्या अवैध साठ्यांवर धडक कारवाई सुरु आहे. दोन दिवसांच्या गोपनीय कारवाईत आतापर्यंत 14 कोटी 31 लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात आतापर्यंत विषबाधा होऊन 9 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

फवारणी करताना विषबाधा होऊन विदर्भात आतापर्यंत 30 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कृषी विभागाने अवैध कीटकनाशक साठ्याविरोधात कडक पावलं उचलली आहेत. शिवाय राज्य सरकारने चिनी फवारणी पंप वापरण्यावरही बंद घातली आहे.

विषबाधा होण्यामागची कारणं काय?

अतिविषारी जहाल कीटकनाशकांचा वापर,  परवाना नसलेली कीटकनाशकांची कृषी केंद्र चालकांकडून होणारी विक्री, शेतकरी आणि शेतमजूर यांच्याकडून योग्य दक्षता न घेता केली गेलेली फवारणी, कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीसाठी मार्गदर्शनाचा अभाव ही विषबाधा होण्यामागची प्रमुख कारणं असल्याचं समोर आलं आहे.

चिनी बनावटीचा पंप बाजारात 3 हजार रुपयांपासून 5 हजार रुपयांपर्यंत मिळतो. पेट्रोलवर चालणारा हा पंप आहे. त्यामुळे कमी वेळात जास्त फवारणी होते. त्यामुळे अलीकडच्या काळात या पंपांचा वापर वाढला आहे.

संबंधित बातम्या :

चिनी बनावटीचे फवारणी पंप वापरल्याने शेतकऱ्यांना विषबाधा?


पिकावर फवारणी करताना विषबाधा, धुळ्यात शेतकऱ्याचा मृत्यू