मुंबई : बंडखोरी करणाऱ्या आमदार तानाजी सावंतांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यासाठी मातोश्रीवर आलेल्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र या बैठकीत सावंत यांच्याविषयी कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं बंडखोरी करणाऱ्या तानाजी सावंत यांच्या विरोधातला नाराजीचा सूर आज मातोश्री दरबारी पोहोचला. तानाजी सावंतांची हकालपट्टी करण्याची मागणी करत उस्मानाबाद आणि सोलापुरातले शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर दाखल झाले होते. या बैठकीत कुठल्याही शिवसैनिकाने तानाजी सावंत यांच्याविषयी तक्रार केली नाही. फक्त संघटनात्मक चर्चा झाली. कुणीही त्यांच्या हकालपट्टीची मागणी देखील कुणी केली नाही, असे देखील विनायक राऊत यांनी यावेळी सांगितलं. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांची शिवसेनेत गय केली जात नाही, मात्र आजच्या बैठकीत तानाजी सावंत यांच्याविषयी कुठलीही चर्चा झाली नाही, असेही ते म्हणाले.


दुसरीकडे सावंत यांना मंत्रीपद मिळावे यासाठी आग्रही असलेले सोलापूर शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे- पाटील यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून त्याबद्दल माहिती देण्यात आली आहे. लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान त्यांच्या जागी सोलापूर जिल्हाच्या प्रभारी जिल्हाप्रमुखपदी पुरुषोत्तम बरडे यांची निवड करण्यात आली आहे.


शिवसेनेचे माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न दिल्याने शिवसैनिकांनी आग्रही भूमिका घेतली होती. सोलापुरात लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांनी शिवसैनिकांची बैठक घेत पक्षावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जातं आहे. सोबतच उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये तानाजी सावंत गटाने भाजपला साथ दिली. सावंत यांची ही भूमिका पक्षाला चांगलीच जिव्हारी लागल्याचं दिसत आहे.

आज दुपारी सोलापूर आणि उस्मानाबाद येथील कार्यकर्त्यांची मातोश्री कार्यालयावर बैठक झाली. या बैठकीत सावंत यांच्याविरोधात काही कारवाई होते का याकडे लक्ष लागून होते. मात्र या बैठकीत सावंत यांच्याविषयी काहीच चर्चा झाली नसल्याचं खासदार विनायक राऊत यांनी बैठकीनंतर सांगितलं.

शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये नाराजी वाढली आहे. तानाजी सावंतांनी घेतलेल्या शिवसेना विरोधी भूमिकेमुळे शिवसैनिकांचा तानाजी सावंतांवर रोष आहे. या बैठीकाला तानाजी सावंतांच्या अनुपस्थितीमुळे शिवसैनिकांमधील नाराजी आणखी वाढली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी केली जात होती. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तानाजी सावंत नाराज झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही त्यांचे खटके उडाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीतही तानाजी सावंत यांनी बंड करत भाजपसोबत हातमिळवणी केली होती. याचा फटका याठिकाणी निवडणुकीत शिवसेनेला बसला. तसेच उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यातही त्यांनी दांडी मारली होती. एकूणच तानाजी सावंतांनी शिवसेनाविरोधी भूमिका घेतल्याने शिवसैनिक नाराज आहेत.
तानाजी सावंतांविरोधात पोस्टरबाजी

सोलापुरात काही दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली होती. माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांचा खेकडा असा उल्लेख करत टीका करण्यात आली. 'उद्धव साहेब हा खेकडा सोलापूर धाराशिवची (उस्मानाबाद) शिवसेना पोखरत आहे, वेळीच नांग्या मोडा' असं म्हणत निशाणा साधण्यात आला होता. मात्र हे पोस्टरबाजी कुणी केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही.