Margashirsha 2023 First Thursday : मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. या महिन्यातील प्रत्येक गुरुवार पूजेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. आज मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार असून या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा कशी करायची? जेणेकरून तिचा आशीर्वाद तुमच्या घरावर वर्षाव होईल, जाणून घेऊया संपूर्ण माहिती...


मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे खूप महत्त्व


धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे. या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात. यासोबतच काही खास देवी-देवतांचीही पूजा केली जाते. या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे खूप महत्त्व आहे. 14 डिसेंबर 2023, मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे आणि या दिवशी देवी महालक्ष्मीची पूजा करण्याची आणि तिच्यासाठी व्रत ठेवण्याची विशेष परंपरा आहे. जाणून घेऊया मार्गशीर्षाच्या पहिल्या गुरुवारी लक्ष्मीची पूजा कशी केली जाते आणि त्याचे काय फायदे होतात.


मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी लक्ष्मीची पूजा केल्याने लाभ होईल


मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फळ प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेचे जेवढे महत्त्व आहे, तेवढेच महत्त्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचे आहे. असे मानले जाते की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत करतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरातील संपत्तीचे भांडार भरलेले असते. या दिवशी रांगोळी काढली जाते. घरातील महिला लक्ष्मीचे स्वागत करतात. असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केले तर लोकांवर गरिबीची सावली कधीच पडत नाही. देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तावर सदैव राहतो. यासोबतच या महिन्यात सूर्यास्तानंतर रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद मिळतो.


अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करावी.


पूजा करण्यापूर्वी जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी.
रांगोळीने स्वस्तिक मांडून त्यावर चौरंग ठेवावा. चारीबाजूला रांगोळी काढावी.
चौरंगावर लाल कपडा घालून त्यावर तांदूळ किंवा गव्हाने चक्राकार करावे. त्यावर हळद-कुंकू वाहावे.
पाण्याच्या तांब्यात दूर्वा, सुपारी आणि शिक्का सोडावा. 
कलशाला बाहेरून हळद-कुंकवाचे बोटं लावावे.
तांब्याच्या नंतर आजूबाजूला विडे किंवा आंब्याची पाने सजवून मधोमध नारळ ठेवावा.
कलश चक्राकारावर ठेवावा.
समोर लक्ष्मी श्रीयंत्र ठेवावे.
लक्ष्मीसमोर दिवा लावावा.
लक्ष्मीची षोडशोपचार पूजा करावी.
फळं, मिठाई, दुधाचा नैवेद्य दाखवावा. 
देवीला कमळाचे फूल अर्पित करावे.
लक्ष्मी पूजनानंतर कुटुंबासोबत आरती करावी. 
श्री लक्ष्मी नमनाष्टक वाचावे. व्रत कथा वाचावी.
मनातील इच्छा प्रकट करून प्रार्थना करावी. 
संध्याकाळी पुन्हा देवीची आराधना करुन नैवेद्य दाखवावे. 
गायीसाठी एक पान वेगळं काढावे.
नंतर कुटुंबासह आनंदाने भोजन करावे.
दुसर्‍या दिवशी कलशामधील पाणी घरात शिंपडावे आणि नंतर पाणी नदी किंवा तलावात वाहून द्यावे, किंवा तुळशीच्य झाडाला घालावे.
पाने घरातील चोर बाजूला ठेवून द्यावे नंतर निर्माल्यात टाकावे.
शेवटल्या गुरुवारी पाच कुमारिका किंवा पाच सवाष्णींना बोलावून हळद-कुंकू, फळं, दक्षिणा आणि महालक्ष्मी व्रत कथा पुस्तक देऊन त्यांचा सत्कार करावा.


श्रीमहालक्ष्मी-व्रताची कथा


ही कहाणी आहे. द्वापार-युगातली. भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली.
 
तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता प्रजादक्ष होता. चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकून आठ अपत्ये होती. सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा-राणीने कन्येचे नाव शामबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे. त्याने राजा आणखी सुखी होईल; प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबाकडे राहिले, तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले, फाटकी वस्त्रे ल्याली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत-टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, "कोण गं बाई तू? कुठून आलीस? काय काम काढलंस? तुझं नाव काय? गाव काय ? काय हवं तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्रीमहालक्ष्मी म्हणाली, "माझं नाव कमलाबाई. द्वारकेला राहते मी. तुझ्या राणीला भेटायला आलेय. कुठे आहे ती? दासी म्हणाली, "राणीसाहेब महालात आहेत. त्यांना सांगायला गेले, तर त्या माझ्यावरच रागावतील. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील. तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब." म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली. "तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्‍नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत. नवरा तिला मारहाण करी. ह्या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी-तापाशी भटकू लागली. तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली. मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणार्‍या श्रीमहालक्ष्मी-व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती, समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती दोघे पती-पत्‍नी लक्ष्मी-लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे." म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, " मला सांगाल ते व्रत? मी करीन ते नेमाने. उतणार नाही, मातणार नाही; घेतला वसा टाकणार नाही."



म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकीत निघणार, तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, "कोण गं तू थेरडे? इथे कशाला आलीस ? जा इथून." तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती, हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार, तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शामबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला नि कळवळून म्हणाली, "आजी, रागावू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते." राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्रीमहालक्ष्मीला तिची दया आली. तिने शामबालाला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता.


 
पुढे त्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली. राजकन्या शामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मीव्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले.
 
लवकरच शामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखा-समाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव, ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती; ती स्थिती आता बदलली. अन्न-पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे; पण तो तरी काय करणार? एकेक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता.
 
एक दिवस भद्रश्रवाला वाटले, मुलीकडे जावे, तिला पहावे आणि चार-आठ दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून-चालून तो खूप दमला होता; म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. शामबालालाही ते समजले. शामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान-सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली.
 
भद्रश्रवा परत जायला निघाला, तेव्हा शामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे, हे ऐकून सुरतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय? हंड्यात धन नव्हतेच. होते फक्त कोळसे ! महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्र्श्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता.
 
दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरतचंद्रिकेला एक-एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरतचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सुरतचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली. तेव्हा शामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. शामबालाने आईकडूनही महालक्ष्मी-व्रत करवून घेतले. चार दिवस मुलीकडे राहून सुरतचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसांतच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई-वडिलांना भेटण्यासाठी म्हणुन शामबाला माहेरी आली. पण 'बाप' भेटायला गेला असताना त्याला शामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता; पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही,' हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे शामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता. पण शामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली.
 
स्वगृही आल्यावर मालाधराने शामबालेला विचारले, " माहेराहून काय आणलंस?" शामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधराने झाकण काढून आत पाहिले, तर हंड्यात मिठाचे खडे ! मालाधराने चकित होत पत्‍नीला विचारले, "हे काय? या मिठाचा काय उपयोग? शामबाला म्हणाली, "थोडं थांबा, म्हणजे कळेलच." त्या दिवशी शामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अळणी. मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अळणी लागले. मग शामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न-पदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. "हा मिठाचा उपयोग!' शामबाला पतीला म्हणाली. मालाधरलाही तिचे म्हणणे पटले. जे कुणी महालक्ष्मी-व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्रीमहालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावरसुद्धा माणसाने उतू नये, नित्य नेमाने श्रीमहालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन-चिंतन करावे; म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील; तुमची कामना पूर्ण करील.
 
महालक्ष्मीची ही कथा, कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण ॥
 
ॐ महालक्ष्मी नमः । ॐ शांतिः शांतिः शांतिः शांतिः ।


श्री महालक्ष्मीची आरती


जय देवी जय देवी जय महालक्ष्मी।
वससी व्यापकरुपे तू स्थूलसूक्ष्मी॥
करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता।


पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकान्ता।
कमलाकारें जठरी जन्मविला धाता।
सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गातां॥
जय देवी जय देवी...॥
 
मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं।
झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी।
माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी।
शशिकरवदना राजस मदनाची जननी॥
जय देवी जय देवी...॥


तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी।
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी।
गायत्री निजबीजा निगमागम सारी।
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी॥
जय देवी जय देवी...॥
 
अमृतभरिते सरिते अघदुरितें वारीं।
मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं।
वारी मायापटल प्रणमत परिवारी।
हें रुप चिद्रूप दावी निर्धारी॥
जय देवी जय देवी...॥
 
चतुराननें कुश्चित कर्मांच्या ओळी।
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी।
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी।
मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी॥
जय देवी जय देवी...॥


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Margashirsh 2023 : मार्गशीर्ष मासारंभ ! महालक्ष्मी व्रताचे 4 गुरूवार कोणते? महत्त्व जाणून घ्या