मुंबई : तुम्ही जर आहारात मिठाचा अतिरिक्त वापर करत असाल, तर सावधान. कारण अतिरिक्त मिठामुळे तुमच्या शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात.


 

हल्ली अनेकांना उच्चरक्तदाबाचा त्रास जाणवत आहे. मात्र त्याचं कारणच मीठ असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मिठाच्या अधिकच्या वापराने उच्चरक्तदाब होतोच, शिवाय त्यामुळे हृदयरोगाचं प्रमाणही वाढलं आहे.

 

हृदयरोगासंबंधीच्या समस्यांची 90 टक्के कारणं म्हणजे धुम्रपान, तणाव, मद्यसेवन, खूप कमी किंवा खूप जास्त झोप ही आहेत.

 

शरीरात किती प्रमाणात मीठ असावं?

 

तज्ज्ञांच्या मते, रोजच्या आहारातून केवळ 5 ते 6 ग्रॅम मीठ शरीरात जाणं आवश्यक आहे. मात्र सध्या यापेक्षा दुप्पट-तिप्पट प्रमाणात मीठ शरीरात जात असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळेच उच्चरक्तदाबाचं प्रमाण वाढलं आहे.

 

त्याचा परिणाम म्हणजे, शहरी भागात 30 ते 40 टक्के तर ग्रामीण भागात 12 ते 17 टक्के रुग्णांना उच्च रक्तदाबाची समस्या जाणवत आहे.

 

उच्चरक्तदाबाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हृदयविकाराचा झटका, अर्धांगवायू, स्मृतीभ्रंश, दृष्टी जाण्याची भीती अशा समस्या उद्भवू शकतात.

 

अमेरिकेत मीठ कमी वापरण्यासाठी

मिठाच्या अतिरिक्त वापराच्या दुष्परिणामांमुळे अमेरिकेने तातडीने हालचालींना सुरुवात केली आहे. त्याचाच परिणाम म्हणून अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये खाद्य पदार्थांत मीठ कमी वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

अमेरिकेत दररोज सुमारे 3,400 मिलीग्रॅम मिठाचा वापर होतो. मात्र एफडीएने पुढील दोन वर्षात हे प्रमाण 3000 मिलीग्रॅम आणि पुढील 10 वर्षात 2,300 मिलीग्रॅमपर्यंत आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे.