Health Tips: मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच जाणवू लागला आहे. या ऋतूमध्ये तब्येतीची काळजी जरा जास्तच घेतली जाते. उन्हाच्या दाहकतेमुळं अनेकदा शरीरातील पाण्याची पातळी खालावते, ज्यामुळे मळमळ, डोकेदुखी, चक्कर येणं यांसारख्या समस्या उदभवतात. वातावरणातील तापमानाचा पारा चढलेला असताना, पाणी न पिणं किंवा कमी पाणी पिण्याची चूक कधीही करु नका. 


उन्हाळ्याच्या या दिवसांमध्ये खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये महत्त्वाचे बदल करा. काही फळं आणि भाज्या खाण्याला आवर्जून प्राधान्य द्या. आज आपण अशाच काही फळं आणि भाज्यांवर नजर टाकणार आहोत, ज्यांच्या सेवनानं शरीरातील पाण्याची पातळी राखली जाते. 


Morning walk benefits | इव्हिनिंग वॉकच्या तुलनेत मॉर्निंग वॉक अधिक फायद्याचा; पाहा कसे आहेत याचे परिणाम


टरबूज- टरबूज या फळाममध्ये तब्बल 92 टक्के पाणी असतं. त्यामुळं याच्या सेवनानं शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होते. यामध्ये विटॅमिन, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखी पोषक तत्त्वंही असतात. 


काकडी- काकडीमध्ये 95 टक्के पाण असतं. विटॅमिन, पोटॅशियम, मॅग्नेशियमचीही भरपूर मात्रा काकडीमध्ये असते. काकडीमध्ये कॅलरीचं प्रमाण कमी असतं. शरीरासाठी काकडी डिटॉक्सिफायरचं काम करण्यासोबतच त्वचेचं सौंदर्य आणखी खुलवण्यासाठीही काकडीचा वापर केला जातो. 


आंबा - आंब्याचा गोडवा जितका सर्वांच्याच जिभेचे चोचले पुरवतो, तितकंच हे फळ अनेक पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असं आहे. यामध्ये विटॅमिन ए, सोडियम, फायबर आणि 20 टक्क्यांहून जास्त मिनरल्स आढळून येतात. कॅलरीवर लक्ष देणाऱ्यांपैकी तुम्ही असाल, तर मात्र काळजी घ्या. कारण आंब्यामध्ये फार कॅलरी असतात. 


संत्र- संत्र मुळातच एक थंड फळ. यामध्ये 88 टक्के पाणी असतं. विटॅमिन ए, सी, कॅल्शियम आणि फायबर अशी तत्त्वं या फळामध्ये असतात. उन्हाळ्यामध्ये या फळाच्या सेवनामुळं शरीरातील पाणी पातळीत समतोल राखता येतो. या फळाच्या सेवनामुळे शरीरातील पोटॅशियमची कमतरचा दूर होते. 


टोमॅटो- टोमॅटो वर्षाच्या बाराही महिने उपलब्ध असतो. यामध्ये 95 टक्के पाण्याचं प्रमाण असतं. याच्या वापरामुळं फोलेट, पोटॅशियम, फायटोकेमिकल्स यांसारखी पोषक तत्त्वं मिळतात.