Vicky Kaushal Chhaava Movie Dialogue: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) 'छावा' (Chhaava Movie) सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालत आहे. रिलीज होताच 'छावा'नं भल्या भल्या दिग्गजांना गुडघे टेकायला भाग पाडलं. एवढंच नाहीतर, 'छावा'नं फक्त पाचच दिवसांत आपलं बजेट वसूल केलं आणि आता छप्पडफाड कमाई करत आहे. 'छावा'नं 1871 कोटींची कमाई करणाऱ्या 'पुष्पा 2'ला देखील सोडलेलं नाही. तेराव्या दिवशी सर्वाधिक कमाई करत 'छावा'नं पुष्पाभाऊला मागे टाकलं आहे. या ब्लॉकबस्टर ठरलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे.

स्वराज्याचे धाकले धनी, छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर मांडणारा हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.  चित्रपटाची पटकथा, म्युझिक आणि चित्रपटाचे डायलॉग्स सर्वांच्या काळजाचा ठोका चुकवत आहेत. या सिनेमातला प्रत्येक डायलॉग अंगावर शहारे आणतो. अशातच एका डायलॉगबाबत सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी एक किस्सा सांगितलाय.

'छावा'मध्ये ज्यावेळी औरंगजेब दख्खनमध्ये येऊन मराठ्यांना संपवण्याचा कट आखतो आणि महाराष्ट्रातच ठाण मांडतो. तेव्हा शंभू राजे आणि मावळे वेगवेगळ्या योजना आखत औरंगजेबाचं सैन्य ठार करत असतात आणि त्यांचे कट उधळवून लावतात. अशातच छत्रपती संभाजी महाराजांना कळतं की, इतर काही प्रांतातील आपलेच मराठे औरंगजेबाला सामील झाले आहेत, तेव्हा महाराज स्वतः संगमेश्वरात येत सर्व प्रांत प्रमुखांना बोलावणं धाडतात. 'छावा'मधल्या याच सीनबाबत दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी एक किस्सा शेअर केला आहे. 

"...आणि शेवटची ओळ..." : लक्ष्मण उतेकर 

पिंकव्हीलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर म्हणाले की, "त्या सीनमधील लास्ट लाईन 'ओम नमः पार्वती पतये...' ही स्क्रिप्टमध्ये नव्हतीच. कॅमेरा रोल करण्याअगोदर आम्ही राजेंना बोलावलं, ज्या क्षणी त्यांनी एन्ट्री केली, त्या क्षणी सेटवर सगळे स्तब्ध झाले. आणि एका टेकमध्ये आम्ही शुटिंगला सुरुवात केली, कोणत्याही रिहर्सलशिवाय... शुटिंगदरम्यान, प्रत्येकाच्या अंगावर काटा येत होता. आणि शेवटची ओळ 'ओम नमः पार्वती पतये...' ती ओळ विक्की कौशलचं ॲडिशन होतं, आणि त्या ओळीनं मॅजिक झालं..."; असं लक्ष्मण उतेकर यांनी सांगितलं.

दरम्यान, 'छावा' 2025 मधला सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. 'छावा' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात बॉलिवूड स्टार विक्की कौशलनं छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, अक्षय खन्नानं मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका निभावली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महाशिवरात्रीला 'छावा'वर भोलेनाथाची कृपा; तेराव्या दिवशी सर्वाधिक कमाईचा रचला रेकॉर्ड, 'पुष्पा 2'लाही धूळ चारली