मुंबई : ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचं वृद्धापकाळाने निधन झालं असून ते  84 वर्षांचे होते. ठाण्यातील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रवी पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये काल केलं आहे. 'अगंबाई सासूबाई' ही रवी पटवर्धन यांची शेवटची मालिका ठरली.


1944 मध्ये वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी रवी पटवर्धन यांनी एका नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात काम केलं होतं. या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष हे बालगंधर्व होते, तर आचार्य अत्रे हे स्वागताध्यक्ष होते. आरण्यक हे नाटक रवी पटवर्धन यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर केलं. त्यामध्ये त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. त्यानंतर अगदी वयाच्या 82व्या वर्षातही या नाटकात ते तीच धृतराष्ट्राची भूमिका करत होते.


सध्या ते झी मराठीवरील 'अगंबाई सासूबाई' या मालिकेतील आशुतोष पत्की म्हणजेच, सोहमच्या आजोबांची भूमिका साकारत होते. फार कमी वेळातच रवी पटवर्धन यांनी साकरलेल्या या मालिकेतील आजोबांच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं. लाडावलेल्या सोहमला धाकात ठेवणारे आजोबा... आणि नातवाला 'सोम्या... कोंबडीच्या' असं म्हणणारे 'दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी' या भूमिकेतील रवी पटवर्ध यांच्यावर अख्या महाराष्ट्राने भरभरून प्रेम केलं.


कोरोना काळात चित्रिकरणावर लावण्यात आलेली बंदी यामुळे मालिकांचं चित्रिकरण बंद करण्यात आलं होतं. दरम्यान, अनलॉकमध्ये चित्रिकरणाला परवानगी मिळाल्यानंतर एकदा दोनदा रवी पटवर्धन व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यामातून मालिकेत दिसून आले होते. त्यांच्या वयामुळे ते चित्रिकरणासाठी प्रत्यक्ष उपस्थित नव्हते.


रवी पटवर्धन मुंबईच्या रिझव्‍‌र्ह बॅंकेत नोकरी करत होते. ते ठाण्यात राहतात. नोकरीच्या कालावधीत बॅंकेतील त्यांचे सर्व सहकारी, अधिकारी आणि व्यवस्थापन यांच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची हौस भागवता आली. ठाण्यातील राहत्या घरातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.