Marathi Actress On Vaishnavi Hagawane Death Case:  संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला अटक केली आहे. त्याचसोबत वैष्णवीचा दीर सुशीललाही अटक करण्यात आली आहे. वैष्णवीनं सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यावर सात दिवसांपासून राजेंद्र आणि सुशील मोकाट होते. पोलीस त्यांचा शोध घेत होते. अखेर आज पहाटे साडेचारच्या सुमाराला या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केलीय. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही आधीच अटक  झालीय. 

वैष्णवीनं 16 मे 2025 रोजी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवीनं स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशातच आता या प्रकरणावर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. सेलिब्रिटींसह अनेकांनी याप्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. अशातच एका मराठी अभिनेत्रीनंही सोशल मीडियावरुन याप्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. अश्विनी महांगडेनं सोशल मीडियावर पोस्ट केलीय. 

मराठी अभिनेत्री इन्स्टा पोस्टमध्ये काय म्हणाली? 

मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेनं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलंय की, "ही माणसं शिकलेली, पैशानं श्रीमंत असली तरीही मानसिकता... सुनेला मारहाण करून, दरवेळी माहेरकडून काहीना काही आणायला सांगणं ही क्रूर बाब आहे आणि आरोपींना योग्य ती शिक्षा व्हायला हवी." पुढे बोलताना ती म्हणाली की, "आता जर हे प्रकरण दाबले, तर पुन्हा एकदा पैसे आणि पद यांचा विजय होईल आणि न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह. यावर आताच वचक बसणे गरजेचे आहे." तसेच, अश्विनीनं स्टोरीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टॅग करुन त्याखाली आपलीच लाडकी बहीण असं म्हटलं आहे. त्याखाली अश्विनीनं या घटनेचा जाहीर निषेध असंही म्हटलं आहे. 

अश्विनी व्यतिरिक्त हेमंत ढोमेनंही केलीय पोस्ट 

दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमे यानंही वैष्णवी आत्महत्या प्रकरणी पोस्ट केली आहे. हेमंत ढोमे म्हणाला की, "आजच्या काळात हुंडाबळी गेलाय, आजच्या काळात तरी अशी घटना होऊ नये म्हणून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे." 

दरम्यान, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी तिचा पती शशांक राजेंद्र हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे, नणंद करिष्णा राजेंद्र हगवणे यांना अटक केली आहे. तर, सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे आणि दीर सुशील राजेंद्र हगवणे तब्बल सात दिवस फरार होते. अखेर आज पहाटे दोघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र वैष्णवीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या क्रूर सासरच्या लोकांना कठोरात कठोर शिक्षा ठोठवावी, अशी मागणी करतोय.