मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे म्हणजेच एसआयटीकडे वर्ग करावा, अशी मागणी करणाऱ्या दोन जनहित याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. यावर सुनावणी घेण्यापूर्वी यात प्रतिवादी करण्यात आलेल्या केंद्र आणि राज्य सरकारला या याचिकांची प्रत उपलब्ध करून देण्याचे निर्देश बुधवारी देत मुंबई उच्च न्यायालयाने या याचिकांवर उद्या, शुक्रवारी सुनावणी घेण्याचे निश्चित केलं आहे.


सुशांतने 14 जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. सुशांतने मानसिक दबावाखाली आत्महत्या केली असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यावर मुंबई पोलिस अधिक तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांकडून होत असलेल्या उशिरामुळे प्रत्येक दिवशी महत्त्वाची कागदपत्रे आणि पुरावे नष्ट केली जात असल्याचा दावा करत एक जनहित याचिका नागपूरचे रहिवासी असलेल्या समीर ठक्कर यांनी दाखल केली आहे. बॉलिवूड, राजकारण आणि अंडरवर्ल्ड यांचे एकमेकांशी असलेल्या संबंधांचा सुशांत बळी ठरल्यामुळे त्याने आत्महत्या केली, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे.

हे ही वाचा- सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत होणार, बिहार सरकारची शिफारस केंद्राकडून मान्य

तर एका यशस्वी अभिनेत्याने अचानकपणे केलेल्या आत्महत्येमुळे सर्वसामान्यांच्या मनात बॉलीवूडमधील नेपोटिझमविरोधात आक्रोश पहायला मिळत आहे. तसेच सुशांतच्या मृतदेहाचे फोटो हे सर्वसमान्यांमध्ये लीक झाले. यामुळे मुंबई पोलिसांच्या तपास प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करत या प्रकरणाची सीबीआय किंवा विशेष तपास पथक म्हणजेच (एसआयटी) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी दुसरी जनहित याचिका कोलकाता न्यायालयात वकिल असलेल्या प्रियांका तिब्रेवाल यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या दोन्ही याचिकांवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली, तेव्हा हायकोर्टानं या याचिकांवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.

25 फेब्रुवारीला कोणतीही लेखी तक्रार आली नव्हती, सुशांतच्या वडिलांच्या दाव्यावर मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण