मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या शोसाठी चर्चेत असते. पण श्वेता सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. श्वेता तिवारी आणि तिचा पती अभिनव कोहली यांच्यात आलबेल नसल्याचं म्हटलं जात आहे.


हे दोघे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत आहेत. दोघांमध्ये एकमेकांच्या करिअरबाबत वाद होत आहेत. अभिनवला श्वेताचं यश पचत नाही, अशी चर्चा आहे.

"मात्र श्वेता आणि माझ्यात सगळं आलबेल आहे. श्वेताच्या यशामुळे मी कधीच असुरक्षित नव्हतो. आम्ही दोघे आपापल्या करिअरवर लक्ष केंद्रीत करत असून आनंदात आहोत," असं स्पष्टीकरण अभिनवने दिलं.

श्वेता आणि अभिनव एका शोच्या सेटवर भेटले होते. लग्नाआधी दोघांनी एकमेकांना तीन वर्ष डेट केलं होतं. त्यानंतर 2013 मध्ये दोघांनी लग्न केलं. दोघांना रेयांश नावाचा एक मुलगाही आहे.

श्वेता तिवारीचं हे दुसरं लग्न आहे. याआधी श्वेताने राजा चौधरीशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 9 वर्षानंतर 2007 मध्ये तिने घटस्फोट घेतला होता. "राजा चौधरी कायम मारहाण करत असे," असा आरोप श्वेताने केला होता. या दोघांना पलक ही मुलगी आहे. ती श्वेता आणि अभिनवसोबतच राहते.