Premachi Goshta Serial Update :  'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) मालिकेत आज माधवीसमोर तिचा खरा गुन्हेगार समोर येणार आहे. आता माधवी आपला अपघात करणाऱ्या आदित्यला माफ करणार की शिक्षा देणार? सावनी आता मुक्ता-सागरविरोधात कोणता कट आखणार आदी प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मिळणार आहेत. 


आदित्यनेच तुमचा अपघात केला असल्याचे  सागर माधवीला सांगतो आणि त्याला सगळ्यांसमोर बोलावतो.आदित्यला पाहून माधवीलाही धक्का बसतो. माझा विश्वास बसत नाही असे माधवी सांगते. आदित्य माधवीसमोर हात जोडून माफी मागतो. मला माझी चूक कळली असल्याचे आदित्य सांगतो. 


माधवी आदित्यला माफ करणार...


माधवी ही सागरला आदित्यला घरी घेऊन जाण्यास सांगते. पण, तेवढ्यात माधवी आदित्यला समजावते. तुला ही त्रास झाला असेल याची कल्पना आहे. कार चालवण्याचे तुझे वय नाही. तुझाही अपघात झाला असता, असे माधवी आदित्यला सांगते. वयाची 18 वर्ष पूर्ण आणि प्रशिक्षण घेतल्याशिवाय कार चालवायची नाही असे माधवी आदित्यला बजावते. माझी काही तक्रार नाही. आदित्य माझा नातू आहे. आजीच्या शब्दकोशात नातवासाठी शिक्षा शब्द नाही असे माधवी म्हणते. 


सागर देणार आदित्यला शिक्षा


त्यांनी तुला माफ केले असले तरी मी माफ केले नाही असे सागर आदित्यला म्हणतो. शिक्षा म्हणून या पुढील काही दिवस या घरी यायचे आणि त्यांची काळजी घ्यायची ही तुझी शिक्षा असल्याचे सागर सांगतो. ही गोष्ट तुझ्या भविष्यासाठी महत्त्वाची असल्याचे सागर त्याला सांगतो.


सावनीच्या मनात विष...


सावनी हे सगळे पाहत असते आणि बळजबरी आदित्यला घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. पण, सागर सावनीचा हात झटकतो आणि सावनीला दूर सारतो. मिहिरला माझ्यापासून तोडले तसे आदित्यला तोडणार आहेत. मी हे होऊ देणार नसल्याचे सावनी मनात ठरवते. 


इकडं स्वाती इंद्राला आदित्यने अपघात झाल्याचे सांगते. इंद्राला धक्का बसतो. तेवढ्यात सागर-मुक्ता येतात. इंद्रा सागरला आदित्यबाबत विचारते. तेव्हा सागर सांगतो की, अपघात आदित्य मुळेच झाला होता. पण आता ते प्रकरण मिटले आहे. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे माधवीच्या आईने मिहीर आणि मीहीकाच्या लग्नाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता आपल्याला तयारीला लागायला हवे असे सांगतो. ही बातमी ऐकताच इंद्रा आणि स्वाती आनंदी होतात. 


मुक्ताला व्हिलन ठरवण्यासाठी सावनीचा डाव... 


माधवी गोखलेच्या घरी काय झाले हे आदित्य सावनीला सांगत असतो. पण तेवढ्यात पोलीस घरी येतात आणि आदित्यला अटक करायला आलो आहोत असे सांगतात. मुक्ता कोळींनी तक्रार दाखल केली असल्याचे पोलीस सांगतात. सावनी त्यांच्यासमोर हातापाया पडते आणि आदित्यला अटक न करण्यास सांगते. या सगळ्या प्रकारामुळे आदित्य दुखावला जातो. आदित्यच्या मनात पुन्हा एकदा मुक्ताबद्दल रोष निर्माण होतो. सावनीच्या घरात आलेले पोलीस हे खोटे असतात. सावनी आणि हर्षवर्धन यांनीच हे खोटे पोलीस आणलेले असतात. 


सागर मानणार मुक्ताचे आभार... 


दुसरीकडे घरी सागर मुक्ताचे खूप आभार मानत असतो. मुक्ताच्या समजावण्याने त्याला त्याची चूक उमगली असते. एक बाप म्हणून आपलं काय कर्तव्य आहे हे सुद्धा समजलेलं असतं. आदित्यच्या चुकीचं ओझ त्याच्या मनावरून कमी झालेलं असते. सागर हे बोलणं ऐकून मुक्ता त्याला एवढं गोड बोलू नका नाहीतर मोबाईलमधील तुमचे नाव सागर कडू हे बदलावं लागेल असे सांगते.