मुंबई : स्टार प्रवाहवरील 'आई कुठे काय करते' मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. लग्नाच्या 25 व्या वाढदिवसानिमित्ताने सुरु असलेल्या कार्यक्रमातच अरुंधतीला अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याविषयी समजलं. तिला धक्का बसला खरा पण या धक्यातून सावरत ती नव्या जिद्दीने उभी राहिली. आता या मालिकेत नवा ट्विस्ट येणार आहे. अनिरुद्ध-संजनाच्या नात्याचं सत्य संपूर्ण कुटुंबासमोर येणार आहे.


अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याविषयी समजल्यानंतर कोलमडलेली अरुंधती पुन्हा उभी राहिली. मुलगा यशच्या मदतीने तिने आपली अधुरी राहिलेली गाण्याची आवड जोपासायचं ठरवलं. घरच्या जबाबदाऱ्या न टाळता मात्र त्यातून थोडं अलिप्त होऊन स्वत:ला वेळ द्यायचं ठरवलं. अरुंधतीचं हे वागणं अनिरुद्धला खटकत होतंच. पण आई आणि अप्पांना सत्य कळू नये म्हणून अरुंधतीमध्ये झालेला हा बदल त्याला नाईलाजाने स्वीकारावा लागला.



पण सत्य फार काळ लपून राहत नाही. अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याचं सत्य आता संपूर्ण कुटुंबासमोर येणार आहे. हा धक्का देशमुख कुटुंब पचवू शकेल का? अनिरुद्धला ते माफ करतील का हे पाहणं आता उत्सुकतेचं असणार आहे.


हे संपूर्ण नाट्य मंगळवार 3 नोव्हेंबरच्या विशेष भागात उलगडणार आहे. उत्कंठा ताणून धरणारा हा विशेष भाग असेल. कुटुंबासाठी नेहमीच उभी ठाकणारी अरुंधती आता आपल्या कुटुंबासाठी कोणतं पाऊल उचलणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.


अरुंधती आणि संजना टीव्हीवर वैरी आणि सेटवर मैत्रिणी! आई कुठे काय करते मालिकेच्या कलाकारांशी गप्पा