Marathi Serial Updates Star Pravah :  छोट्या पडद्यावर सध्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत.  सर्व मराठी वाहिन्यांवर नव्या मालिका सुरू झाल्यात आहेत अथवा मालिका प्रसारीत होणार आहेत. या नव्या मालिकांमुळे आता सध्या प्रसारीत होत असलेल्या जुन्या मालिकांपैकी कोणती मालिका निरोप घेणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मागील काही महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या 'स्टार प्रवाह'ने  (Star Pravah) नव्या मालिकांची घोषणा केली आहे. त्यामुळे कोणती मालिका बंद होणार याकडे लक्ष प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.


'स्टार प्रवाह'वर 'घरोघरी मातीच्या चुली’ (Gharo Ghari Matichya Chuli) आणि ‘साधी माणसं’ (Sadhi Mansa) या दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. येत्या 18 मार्चपासून या मालिका सुरू होत असल्याने कोणती मालिका बंद होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या वेळेवर 'घरोघरी मातीच्या चुली' ही मालिका सुरू होणार आहे.  त्यामुळे ही मालिका ऑफ एअर होणार का अशी चर्चा सुरू होती. मात्र, 'आई कुठे काय करते' या मालिकेची वेळ बदलण्यात आली. प्राईम टाइमचा स्लॉट बदलून 'आई कुठे काय करते' या मालिकेला दुपारी 2.30 ची वेळ देण्यात आली आहे.  


कोणती मालिका बंद होणार?


'स्टार प्रवाह' वाहिनीवरून कोणती मालिका ऑफ एअर जाणार,  याची जोरदार चर्चा सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षही पूर्ण न केलेली मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.  ‘कुन्या राजाची गं तू रानी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. ही मालिका मागील वर्षी 18 जुलै रोजी प्रसारीत झाली होती. या मालिकेत अभिनेता हर्षद अतकरीने कबीर आणि अभिनेत्री शर्वरी जोगने गुंजा ही व्यक्तीरेखा साकारली आहे. या मालिकेलाही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. आता खरंच 'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका बंद होणार की या मालिकेची वेळ बदलण्यात येणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.  


‘कुन्या राजाची गं तू रानी’ मालिकेच्या जागी कोणती नवी मालिका?


‘कुन्या राजाची गं तू रानी’ या मालिकेच्या वेळेवर  'साधी माणसं' (Sadhi Mansa) ही नवी मालिका प्रसारीत होणार आहे. अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) आणि अभिनेता आकाश नलावडे (Aakash Nalawade) हे दोघेही या मालिकेत एकत्र काम करणार आहेत.  शिवानी बावकर ही मीराच्या भूमिकेत तर आकाश नलावडे हा सत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. एकाच शहरात राहणाऱ्या या दोघांचे स्वभाव मात्र वेगळे आहेत. त्यामुळे नियती यांच्या भविष्यात काय घडवून आणणार हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. सध्या या मालिकेच्या प्रोमोनंतर प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहचली आहे. 






'घरोघरी मातीच्या चुली'मध्ये रेश्मा शिंदे प्रमुख भूमिकेत


नव्याने सुरू होणाऱ्या 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत जानकी हे महत्त्वाचं पात्र रेश्मा शिंदे साकारणार आहे. ‘रंग माझा वेगळा' या मालिके रेश्माची मुख्य भूमिका होती. ही मालिका कौटुंबिक जिव्हाळा, नातेसंबंधावर भाष्य करणारी असणार आहे.